मंद्रुप: अतिक्रमणाच्या प्रश्नावरुन निंबर्गी ग्रामपंचायतीसमोर महिलेने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.उपसरपंच शिवानंद कादे यांच्या समयसूचकतेमुळे ती महिला वाचली. ही घटना सोमवारी दुपारी निंबर्गी ग्रामपंचायतीसमोर घडली. दिलशाद उर्फ चिंगूबाई बाळाभाई मुलाणी असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.दिलशादबी या आपली वृद्ध आई म्हताबबी मुलाणी व भाऊ राजअहमद मुलाणी यांच्यासमवेत इंदिरानगर भागात राहतात. त्यांच्या नावे २ हेक्टर २० आर जमीन आहे. त्यापैकी १ हेक्टर ५२ आर जमीन भूमिहीन बेघरांसाठी संपादन केली होती. याशिवाय १७२ बेघरांना प्लॉट पाडून देण्याची नोंद तलाठी कार्यालयात आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमत करून आपल्या गट नंबर १७० मध्ये अतिक्रमण केले आहे. त्यावेळी विरोध केला असता महिला पोलिसांकरवी मारहाण करण्यात आली. आम्ही लावलेले कुलूप तोडून अतिक्रमण केले. या ठिकाणी ५ गाळे, ४ दुकाने व ७० घरे बांधण्यात आली. या ठिकाणी अंतर्गत रस्ता करण्यासाठी बुधवारी सर्व्हे करण्यात आला. सोमवारी वाळू, खडी आणून रस्ता करणार असल्याची कुणकुण दिलशादबी व त्यांच्या परिवारास लागली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आमची या कामासाठी हरकत आहे, असे त्या ओरडून सांगत होत्या. त्यांचे म्हणणे कोणीही ऐकले नाही. शेवटी रागाच्या भरात रॉकेल अंगावर ओतले. काडी पेटवणार इतक्यात उपसरपंच शिवानंद कादे यांनी त्यांना वाचविले.
ग्रामपंचायतीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Updated: June 25, 2014 01:51 IST