पंढरपूर : गेल्या १५ दिवसांपासून पंढरीची वाटचाल करणाऱ्या भाविकांच्या मनाला पावसाने दिलेल्या ओढीमुळे लागलेली हुरहूर... वारकरी व स्थानिक शेतकऱ्यांमध्ये पावसाविषयी सुरू असलेली चर्चा... वारी कालावधीत निश्चित पाऊस पडणार असा वारकऱ्यांच्या मनातील आशावाद आज अखेर पंढरीत झालेल्या संततधार पावसामुळे फळाला आला.महिनाभर पावसाने दिलेल्या ओढीने वारीमध्ये वाटचाल करणाऱ्या भाविकांच्या मनाला पावसाविषयी हुरहूर लागली होती. पावसाअभावी पेरणीची कामे खोळंबल्याने आषाढी यात्रेतील भाविकांची संख्याही रोडावली होती. सर्व भाविकांसह स्थानिक शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. रविवारी दुपारी वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांना उन्हाचा चटका व उकाड्याने हैराण केले असताना श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत तुकाराम, श्रीसंत सोपानदेव यांच्या पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करताच पावसाचा हलकासा शिडकाव झाला. त्यामुळे भाविकांचा उत्साह वाढला.
पांडुरंग पावला; पंढरीत पाऊस
By admin | Updated: July 7, 2014 01:07 IST