अरुण बारसकर
सोलापूर: इतर सर्व रासायनिक खतांमध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या डीएपीची आयात करणे भारतीय खत कंपन्यांनाही परवडेनासे झाले आहे. राज्यासाठी साडेपाच लाख मेट्रिक टन डीएपीची मागणी असताना २९ मे पर्यंत केवळ ९४ हजार मे. टन खत साठा शिल्लक होता. म्हणजे मागणीच्या तुलनेत केवळ १७.०९ टक्केच उपलब्धता आहे. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये तुटवडा आहे.
राज्यात सध्या पावसाची दमदार हजेरी सुरू आहे. पावसाने उघडीप देताच व जमिनीत वापसा होताच सगळीकडेच खरीप पेरणीला वेग येईल. पेरणीसाठी, तसेच ऊस व इतर पिकांसाठी यूरिया व डीएपीसारख्या खतांची मागणी वाढणार आहे. राज्यात युरिया मुबलक शिल्लक आहे. मात्र, डीएपी आयात करणे खत कंपन्यांना परवडेनासे झाले आहे. डीएपी खताच्या तुटवड्वामुळे पर्यायी खते वापरण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
४६.८२ लाख मे. टन खताचे नियोजन
२०२२ ते २०२४ या वर्षात राज्यात डीएपीचा वापर प्रतिवर्ष सरासरी ४.५१ लाख मेट्रिक टन झाला आहे, तर संपूर्ण खतांचा वापर तीन वर्षात प्रतिवर्ष सरासरी ४२.१८ लाख मेट्रिक टन झाला आहे. यंदा ४६.८२ लाख मे. टन खताचे नियोजन असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
कंपन्यांना आयात का परवडत नाही?
डीएपीच्या एका बॅगची किंमत २४४५ रुपये ५५ पैसे.
शेतकऱ्यांसाठी १३५० रुपयाला एक बॅग विक्रीसाठी.
केंद्र सरकारकडून एका बॅगेला १ हजार ९५ रुपये एवढी अनुदानापोटीची रक्कम भरण्यात येते.
प्रत्यक्षात एका बॅगचा उत्पादन खर्च तीन हजार रुपयांपर्यंत असल्याने भारतीय खत कंपन्यांना आयात करणे परवडत नसल्याचे विक्रेते सांगतात.
पुढील काळात शेतकऱ्यांकडून डीएपी खताची मागणी वाढणार आहे; परंतु शेतकऱ्यांनी डीएपीला बाजारात पर्यायी असलेली खते वापरावीत. डीएपीऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपीला चांगला पर्याय आहे. एसएसपीसोबत संयुक्त खतांचाही वापर करावा- सुनील बोरकर, कृषी संचालक, निविष्ठा व गुण नियंत्रण
बियाण्यांच्या किमतींमध्ये थेट १० टक्क्यांची वाढ; १० किलो धानाची ८०० रुपयांची बॅग झाली ९०० ची
गडचिरोली : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असल्याने बियाणे कंपन्यांनी कृषी केंद्र केंद्रांमध्ये बियाण्यांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्यांच्या किमतीत सरासरी १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बियाण्याबाबत शेतकरी कृषी केंद्रात जाऊन विचारणा करीत आहेत.
धान बियाण्यांची बॅग ९०० रुपयांना मागील वर्षी धानाच्या बियाण्यांची १० किलो वजनाची बॅग ८०० रुपयांना मिळत होती.
यावर्षी ही बॅग २०० रुपयांना खरेदी करावी लागत आहे. धान बियाण्यांच्या दरात जवळपास १२ टक्के वाढ झाली आहे. इतर बियाण्यांची स्थितीही अशीच आहे. सोयाबीन, कापूस, मका या बियाण्यांच्या किमतीतही १० टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती कृषी केंद्र चालकांनी दिली आहे.
कृषी केंद्रात बियाणे दाखल झाले आहेत. कंपनीनुसार बियाण्यांच्या दरात थोडाफार बदन आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दरात सरासरी १० टक्क्यांनी वाढ झाली आहे - दीपक चिंचोलकर, कृषी केंद्रचालक