एसटी प्रशासनाने २०१६ मध्ये खासगी कंपनीकडून तिकीट मशीन घेतल्या. या मशीनचे प्रिंटर काम न करणे, बॅटरी खराब होणे, मशीन हॅँग होणे, की-पॅड नादुरुस्त होणे, असे एक ना अनेक बिघाड झाले आहेत. या कारणाने राज्यातील १५ ते २० हजार मशीन्स बंद पडल्याचे सांगण्यात आले. मशीनची जबाबदारी संबंधित वाहकावर असल्याने संबंधित वाहकाकडून दुरुस्तीसाठी दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम वसूल केली जात आहे. रक्कम वसूल न केल्यास आगारप्रमुख आणि स्थानकप्रमुख यांना जबाबदार धरून त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
-
इन्फो बॉक्स
खराब पार्ट का दाखवले नाहीत?
२०१६ साली घेण्यात आलेल्या मशीनची क्षमता किती?, मशीनमधील कोणते इलेक्ट्रॉनिक पार्ट किती दिवस चालतात?, जे पार्ट खराब झाले ते पार्ट कामगारांना का दाखवले नाहीत?, वाहकाकडून मशीन ताब्यात घेताना ती सुस्थितीत आहे का नाही? याची जबाबदारी संबंधित कारकुनाची असते; मग वाहकाकडून विनाकारण वसुली का केली जात आहे, असे सवाल वाहकांनी उपस्थित केले आहेत.
-
कोट
‘एसटी’ प्रशासन खासगी कंपनीशी हितसंबंध जोपासण्यासाठी वसुली करत आहे. राज्यभरातून पाच कोटींपेक्षा जास्त रकमेची वसुली आहे. फक्त सोलापूर विभागातून जवळपास ३२ लाखांची वसुली काढण्यात आली आहे. अशा प्रकारे काढलेला आदेश कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. हा आदेश प्रशासनाने मागे घ्यावा अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ.
मुकेश तिगोटे, सरचिटणीस, इंटक