सोलापूर : वीरशैव लिंगायत समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळणार असल्याचे गाजर दाखवले जात आहे. वास्तविक हा दर्जा मिळणार नाही, हे आम्हाला माहीत आहे. त्याऐवजी समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करावा, अशी मागणी करीत ‘शिवा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी करीत जो पक्ष आम्हाला न्याय देईल त्यांच्याच पाठीशी संघटना उभी राहील, असे स्पष्टीकरणही दिले. ‘शिवा’ अ. भा. वीरशैव युवक संघटनेच्या वतीने लिंगायत ओबीसी आरक्षण हक्कासंदर्भात आयोजित बैठकीस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर आ. विजयकुमार देशमुख, संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील, शहराध्यक्ष शिवानंद हिप्परगी, पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस अॅड. प्रशांत शेटे, उमाकांत शेटे, कर्नाटकाचे प्रांत सदस्य मल्लिकार्जुन आरबळे, राजेंद्र कुलकर्णी, शिवराम कमलापुरे, सतीश कानडे, कलंत्रीअप्पा उपस्थित होते. प्रा. धोंडे म्हणाले, १९९९ साली आम्ही वीरशैव धर्मास मान्यता मिळण्याची मागणी केली होती. त्याचवेळी देशभरातून २०० जणांनी वेगवेगळ्या धर्माची मागणी पुढे आणली होती. चर्चेनंतर तशी मान्यता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. धर्माची मान्यता मिळणार नसेल तर अल्पसंख्याकाचाही दर्जा मिळणार नाही, असे असताना समाजाला दर्जा मिळण्याचे गाजर दाखवले जात आहे. तशी आमची मागणीही नाही. समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी असून, ती पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. तुम्ही आम्ही कुठे आहोत. समाज कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित करून उमाकांत शेटे यांनी समाजाची अधोगती होत असल्याची चिंता व्यक्त केली. समाजाला कुठल्याच सवलती नाहीत. व्यापार, उद्योग करावा म्हटले तर अर्थसाहाय्य नाही. पंचाचार्य आणि विरक्त यांच्या वादातच आपण बसलो आहोत. आता मनोहर धोंडे यांना बळ दिल्याशिवाय समाजाचा विकास होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी आ. विजयकुमार देशमुख, अरविंद पाटील, राजेंद्र कुलकर्णी, अॅड. प्रशांत शेटे आदींची भाषणे झाली. तत्पूर्वी उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी समाजाच्या व्यथा मांडल्या. यावेळी मल्लिनाथ उणदे, श्रीशैल गुरगुरे, शंकर उणदे, नानासाहेब देशमुख, बसवराज बिराजदार, शांतेश्वर गुंते आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.-------------ना मागणी, ना निवेदन काकासाहेब कोयटे आणि सुनील रुकारी यांच्या संघटनेने वीरशैव लिंगायत समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, याबाबत कधीच मागणी केली नव्हती ना साधे निवेदनही दिले नव्हते, असा आरोप मनोहर धोंडे यांनी केला.
अल्पसंख्याकांचा दर्जा नको, आरक्षण द्या
By admin | Updated: July 7, 2014 01:16 IST