पंढरपूर : ‘जाता पंढरीशी सुख वाटे जीवा। भेटतो तेव्हा नारायण’ या संत वचनाप्रमाणे देवगड (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथून सोमवारी सकाळी नऊ वाजता मोटरसायकलवर निघालेली भाविकांची वारी मंगळवारी नवीन पुलानजीकच्या भास्करगिरी महाराज मठात विसावली. दिवसभरात पंढरीच्या राणाचे डोळे भरुन दर्शन घेऊन ही वारी आज (बुधवारी) देवगकडे रवाना झाली. हजारो वर्षांची परंपरा असलेली पंढरीची वारी आता बदलत्या काळाबरोबर हायटेक होऊ लागली असून, बैलगाडीच्या ताफ्यासह पायी चालत येणारे भाविक आता वेगवेगळ्या वाहनांतून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येऊ लागले आहेत. देवगड येथील दिनकर गर्जे यांच्या नेतृत्वाखाली आठशे मोटरसायकलस्वारांनी आगळी वेगळी दिंडी काढली. यामध्ये १६०० भाविक आहेत. मोटरसायकलवर पताका फडकावत ३00 कि. मी. अंतर पार करून आलेल्या दिंडीतील भाविकांनी पंढरपुरातही मोटरसायकलवरून नगरप्रदक्षिणा करीत भास्करगिरी महाराज मठात मुक्काम केला.आठ वर्षांपूर्वी पंधराशे मोटरसायकलने ही दिंडी सुरूवात करण्यात आली. आता यामध्ये आठशे मोटरसायकली असून, पेट्रोलचा खर्च यात सहभागी होणारे भाविक करीत असून, जेवण, निवासाचा खर्च दिंडी प्रमुख दिनकरराव गर्जे, अजित फाटके, नगरचे रामभाऊ खंडाळे व दिलीपराव वाघचवरे हे करीत आहेत. यामध्ये कोणीही सहभागी झाल्यास त्यांचे स्वागत करण्यात येत असून, या दिंडीत सहभागी होण्यासाठी काहीच अट नाही. आज नगरप्रदक्षिणा करून ही दिंडी पंढरीत विसावली असून, बुधवारी सकाळी पुन्हा परतीच्या मार्गाला लागणार आहे.
देवगडची वारी पंढरीच्या दारी
By admin | Updated: July 3, 2014 01:27 IST