सोलापूर : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘सिटू’च्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज गेंट्याल चौकात रास्ता रोको केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘मोदी सरकार की तानाशाही नही चलेगी.. नही चलेगी’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
आंदोलन थांबविण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा आला; पण संतप्त कार्यकर्त्यांच्या रास्ता रोकोमुळेे बोरामणी नाका ते गुरुनानक चौक दरम्यान वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. माजी आमदार नरसय्या आडम आणि ‘सिटू’चे राज्य महासचिव ॲड. एम. एच. शेख यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दिल्लीतील आंदोलनावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास ‘सिटू’कडून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आडम यांनी दिला.
यामध्ये अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, एस.एफ.आय. तसेच ‘सिटू’ प्रणीत अन्य संघटित-असंघटित कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते. यावेळी नगरसेविका कामिनीताई आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, युसूफ शेख, हनीफ सातखेड, सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू, विक्रम कलबुर्गी, अनिल वासम आदी उपस्थित होते.
............
आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल
रास्ता रोको प्रकरणी सिटूच्या आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह आठ ते दहा जणांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.