सोलापूर : आसरा परिसरातून विजापूर रोडला जोडणारा नवा रस्ता करण्याचा ‘प्लॅन’ बारगळला आहे. त्याऐवजी आसरा रेल्वे उड्डाण पुलाची रुंदी वाढविण्याच्या पर्यायावर महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. उड्डाण पुलाची रुंदी वाढविण्याबाबत महापालिका आराखडा तयार करणार आहे.
विजापूर रोडवरील जडवाहने आसरामार्गे वळविल्यानंतर आसरा रेल्वे उड्डाण पुलाची रुंदी वाढविण्याची मागणी पुढे आली. यासाठी महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यादरम्यान होटगी रोडवरून विजापूर रोडला जोडणारा आणखी रस्ता व्हावा, असा विचार काही जणांनी मांडला. मनपा अधिकाऱ्यांनी चेतन फाैंड्री ते जामगुंडी मंगल कार्यालय असा रस्ता करता येऊ शकतो का, यासंदर्भात सर्व्हे करण्यात आला. याबद्दल नगर अभियंता संदीप कारंजे म्हणाले, या सर्व्हेनंतर नवा रस्ता उपलब्ध करून देणे सध्या शक्य होणार नसल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो. त्याला काही तांत्रिक कारणेही आहेत. याउलट रेल्वे पुलाची रुंदी वाढविण्याचा विचार होऊ शकतो. नवा पूल रेल्वे यंत्रणाच उभारेल. मात्र, नवा पूल किती रुंदीचा असावा. तांत्रिकदृष्ट्या नवा पूल बांधणे शक्य आहे का? त्यासाठी काय करावे लागेल, याबद्दलचा अहवाल महापालिका खासगी एजन्सीकडून घेईल. एजन्सी नेमण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला आहे.
----
शासनाकडून पैसे आल्यानंतरच रस्ता दुरुस्ती
आसरा येथील उड्डाण पुलाची चाळण झाली आहे. लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. नवा रस्ता केव्हा होईल, असे विचारले असता कारंजे म्हणाले, पावसाळ्यात शहरातील अनेक रस्त्यांचे नुकसान झाले. शासनाने नव्या रस्त्यांसाठी अहवाल मागवले होते. यात आसरा ते विजापूर रोड या रस्त्याचाही प्रस्ताव देण्यात आला. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतरच नवा रस्ता होईल.
----
खासदारांनी द्यावा निधी
आसरा ते विजापूर रोड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासन निधीची वाट पाहता महापालिकेने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याकडून निधी उपलब्धतेबाबत पत्र घ्यावे. खासदारांनी जुळे सोलापूरवासीयांची गरज लक्षात घेता तत्काळ निधी द्यावा, अशी मागणी यसदी फाउंडेशन सामाजिक संस्थेचे सिद्धाराम डोमनाळे यांनी केली.
-------------
फोटो : आसरा रेल्वे पुलावर खड्डे पडले आहेत. लोक जीव मुठीत घेऊनच वाहने चालवितात.