रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली, आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेशनिंग व्यवस्थेतील कारभार अधिक पारदर्शी होईल, असा दावा केला जात आहे. असे असताना आता रेशन कार्डमधील सदस्यांच्या आधार कार्डचे सत्यापन (व्हेरिफिकेशन) करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे.
अंत्योदय ३१९० कार्डधारक (१६८७६ युनिट), अन्नसुरक्षा केशरी २३८१३ कार्डधारक (१,०५,२१५ युनिट), अन्नसुरक्षा पिवळे २२२६१ कार्डधारक (१,०१,१४० युनिट) अपात्र केशरी १९१६० कार्डधारक (८०,२६० युनिट), ६४६७ शुभ्र कार्डधारक असे एकूण ७४ हजार ८८७ कार्डधारक असून ३ लाख ३ हजार ४९१ युनिट संख्या आहे. अन्नसुरक्षा योजनेतील ४१,८४५ शिधापत्रिकाधारक असून १ लाख ९० हजार ४२४ युनिट आहेत. त्यापैकी १ लाख ५७ हजार १३ युनिटचे आधार लिंक झाले आहे. अंत्योदय योजनेत ३१९० शिधापत्रिकाधारक असून, १५ हजार ६० युनिट आहे. त्यापैकी अशा १२,४४८ युनिटचे आधार लिंक पूर्ण झाले झाले आहे.
प्रत्येक सदस्याचे आधारलिंक गरजेचे
आधार कार्डवरील प्रत्येक सदस्याचे आधार लिंक होणे गरजेचे आहे. रेशन कार्डधारकांचे आधार लिंक झाले आहे, त्या नागरिकांच्या आधार कार्डची पडताळणी पुरवठा विभाग करीत आहे. पुरवठा विभागाच्या या तपासणीत बोगस कार्डधारक आणि त्यातील युनिट कमी झाल्यानंतर धान्यापासून वंचित असलेल्या तालुक्यातील १९ हजार १६० अपात्र केशरी शिधापत्रिकाधारकांना भविष्यात धान्य मिळण्याची शक्यता आहे.