पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ५१०० पोलिसांचा व अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पो. नि. किशोर नावंदे यांनी दिली.मागील तीन वर्षांपासून दुष्काळ असल्यामुळे आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट होणार असा सूर सर्वस्तरातून उमटत असला तरी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याने मात्र चोख बंदोबस्ताची तयारी केली आहे. देशात कुठेही बॉम्बस्फोट सारखी अतिरेकी कारवाई झाल्यास पंढरपूरलाही हाय अलर्टचा इशारा दिला जातो. तत्काळ विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात बसस्थानक, रेल्वेस्थानक या परिसरात सुरक्षितता वाढविली जाते. सध्या आषाढी यात्रा असल्यामुळे पंढरपुरात विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी १० ते १२ लाख भाविक येत असतात. या आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर पडते. यात्रा कालावधीत शहरातील प्रत्येक रस्त्यावर भाविकांची गर्दी असते. या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडून हजारो भाविकांच्या जीवास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने ५१०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.पुणे, सोलापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यातील बॉम्बशोधक पथकही पंढरपुरात दाखल झाले आहे. सर्व अधिकारी व पोलिसांमध्ये व्यवस्थित संपर्क व्हावा, यासाठी १५० वॉकीटॉकीही मिळणार आहेत. ही सुरक्षा जादा करून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, पालखीच्या ठिकाणी, व्हीआयपी असणाऱ्या ठिकाणी असणार आहे. हा सर्व पोलीस बंदोबस्त ३० जून ते १५ जुलैपर्यंत असणार आहे.--------------------असा असणार बंदोबस्तयामध्ये अपर पोलीस अधीक्षक ५, उपविभागीय पोलीस अधिकारी १७, पोलीस निरीक्षक ५२, उपनिरीक्षक १८५, वाहतूक पोलीस कर्मचारी ४५७, महिला पोलीस १५०, पुरूष पोलीस ३०००, महिला व पुरूष होमगार्ड २५००, त्याचबरोबर विशेष कमांडो, जलदकृती दलाची ४ पथके, एस.आर.पी.ची ३ कंपनी व बाजूच्या जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचारी असणार आहेत.
५१00 पोलिसांचा बंदोबस्त
By admin | Updated: July 7, 2014 01:11 IST