मालवण : सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. ‘स्मार्ट’ युगात तरुणांचा साहित्य क्षेत्राकडे ओढा कमी झालेला दिसून येतो. साहित्यात खूप मोठी शक्ती आहे. कोकण प्रांताला साहित्यिकांची देणगी लाभली आहे. तरुणांनी वेगवेगळे साहित्य लिखाण हाताळायला शिकायला पाहिजे. त्यासाठी वाचन हे प्रमुख साधन आहे. शब्दसंपत्तीच्या जोरावर तरुणांनी साहित्यात ठसा उमटावा. साहित्यिकांचा फडकविलेला मराठी साहित्याचा पताका ‘यंग जनरेशन’ पुढे असाच फडकवत ठेवला पाहिजे, असे मार्गदर्शन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलन २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई-दादर येथे होत आहे. संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी सिंधुदुर्गात साहित्य यात्रा आयोजित करण्यात आली होती. रविवारी कणकवली-करूळ येथे उद्घाटन करण्यात आलेली केशवसुत कोकण साहित्य यात्रा सुकळवाड-तळगावला आल्यानंतर कर्णिक यांनी उपस्थित शाळकरी विद्यार्थी व तरुण वर्गाला मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
तरुणांनो, साहित्यात ठसा उमटवा
By admin | Updated: November 19, 2015 00:45 IST