कणकवली : विद्यमान आमदारांकडून गेल्या पाच वर्षात लोकांच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. आमदारांनी स्वत:च कबूल केले आहे की, आपल्याकडून १0 टक्केच काम झाले. युती शासन आले तर उर्वरित काम करण्यात येईल. त्यामुळे ज्यांचा स्वत:वरच विश्वास नाही ते निवडणूक काय जिंकणार? आमदारांना प्रगती पुस्तक काढायला मुंबईला जावे लागते यातच त्यांचे अपयश सिद्ध झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांनी आमदार प्रमोद जठार यांच्यावर केला.कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना नीतेश राणे म्हणाले, आमदारांनी गेल्या पाच वर्षात कोणतेही चांगले काम केले नाही. नुसती पोपटपंची केली. वैभववाडी बस डेपोचा नारळ फोडला. मात्र, पुढे काहीच केले नाही. या जागेचे संपादनदेखील झाले नाही. आगामी काळात आपण जनतेसमोर सत्य परिस्थिती आणणार आहे. मात्र, वैयक्तिक कोणतीही टीकाटिप्पणी करणार नाही. दूध डेअरी चालू केली म्हणतात परंतु त्यातील दूध कोल्हापूरहून आणले जाते. त्यात काम करणारे कामगार हे परप्रांतिय आहेत. त्यामुळे त्याबाबतची वाच्यता वेळ येताच आपण करू. सध्या कणकवली मतदारसंघातील लोकांच्या गाठीभेटी आपण घेत आहोत. देवगडमध्ये १00 घरांमध्ये जावून आपण गणेश दर्शन घेतले आहे. तसेच कणकवलीतील खारेपाटण आणि काही ग्रामीण भागात लोकांमध्ये जावून आपण देवदर्शन घेतले. उवरित दोन दिवसात कणकवली शहर आणि वैभववाडी शहरातील गणेश दर्शन घेणार आहे. तसेच यावेळी आपण काँग्रेस कार्यकर्त्यांसह लोकांच्या घेतलेल्या भेटीमध्ये विद्यमान आमदारांबाबत प्रचंड मोठ्या प्रमाणावर असलेल्या नाराजीचा सूर दिसत आहे. नुसती पोपटपंची करून चालणार नाही. विजय सावंत यांच्या अपक्ष उमेदवारीबाबत पत्रकारांनी छेडले असता त्या विषयावर आताच बोलणे उचित नाही. आधी काँग्रेसची उमेदवारी जाहीर होवू दे चित्र स्पष्ट झाल्यावरच आपण बोलू, अशी बगल राणे यांनी दिली. आपण निवडणुकीला सामोरे जाताना विकासाचे मुद्दे घेवून जाणार आहे. वैयक्तिक टीका टिप्पणीत रस नाही. प्रत्येक उमेदवाराने विकासात्मक स्पर्धा केली पाहिजे, असेही नीतेश राणे म्हणाले. (प्रतिनिधी)
आमदारांकडून लोकांच्या अपेक्षांवर पाणी
By admin | Updated: September 5, 2014 00:16 IST