मिलिंद पारकर - कणकवली -तालुक्यात रस्ते, वीज, पाणी या शिवाय विकासाची कामे होऊ शकतात. मुलभूत समस्या सोडवण्यात कमी पडत असताना लोकांना आर्थिक समृद्धी मिळावी प्रकल्पाचा विचार करणे दुरापास्त आहे. तालुक्यात थेट रोजगार देणाऱ्या प्रकल्पांची वानवा आहेच. त्याशिवाय धरण प्रकल्प रखडल्याने आनुषंगिक समृदधीची दारेही उघडलेली नाहीत. शासकीय दूध योजनेसारखे प्र्रकल्प बंद झाल्यात जमा आहेत. शहरात भुयारी गटार योजनेसारख्या महत्त्वाकांक्षी योजना निधीअभावी अद्याप दूर आहेत. नव्या राज्य सरकारमध्ये जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या विनोद तावडे यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेशी युती झाल्यास आणखी एक मंत्रीपद जिल्ह्याला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढते आहे. साखर कारखाना होऊ घातला आहे. तालुक्यातील काही धरण प्रकल्प रखडले आहेत. या प्रकल्पांना निधी मिळून तातडीने हे प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी नव्या सरकारकडून प्रयत्न झाले पाहिजेत. सर्व धरणप्रकल्प पूर्ण झाल्यास येथील शेतकरी समृद्ध होऊ शकतो.फक्त निधी देऊन काही समस्या सुटत नाहीत. तर त्या विकासकामांच्या दर्जासाठी नियंत्रण ठेवणे हे नव्या सरकारकडून अपेक्षित आहे. प्रत्येक कामातील भ्रष्टाचाराची साखळी या कामांचा दर्जा घसरवते यावर नव्या सरकारकडून काय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. यातील एक म्हणजे रस्त्यांची कामे. तालुक्यात ग्रामीण भागात अनेक रस्ते नादुरूस्त झाले आहेत. या रस्त्यांसाठी निधी देणे आवश्यक आहे. तालुक्यातील सर्वसामान्य रूग्णांसाठी उपजिल्हा रूग्णालय हे आशास्थान आहे. अशावेळी हे रूग्णालय तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि सुविधांनी सुसज्ज करणे सर्वांत महत्त्वाचे आहे. आतापर्यंत चार तालुक्यातील रूग्ण येणाऱ्या या शासकीय रूग्णालयात कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टरांची कायमच वानवा भासत आहे. सर्वसामान्यांना त्यामुळे ओरोस, गोवा बांबुळी अथवा खाजगी रूग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. उपजिल्हा रूग्णालय सुसज्ज झाल्यास तालुक्यातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात थेट रोजगार देऊ शकेल असा उद्योग तालुक्यात अद्याप उभा राहू शकला नाही. तोंडवली येथे येऊ घातलेला स्टील प्रोजेक्ट किंवा शिडवणे येथे होऊ घातलेला साखर कारखाना, कासार्डे येथे नियोजित एमआयडीसी हे प्रकल्प अद्याप प्रत्यक्षात आलेले नाहीत. उद्योग उभारताना राजकारण टाळून त्यामध्ये पारदर्शकता ठेवण्याचे धोरण नव्या सरकारला ठेवावे लागेल. तर स्थानिकांचा विरोध टाळण्यात यश मिळेल. कासार्डे येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसी प्रकल्पातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. त्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. कणकवली शहरातील भुयारी गटार योजनेसाठी सुधारित आराखडा पाठविण्यात आला आहे. या योजनेला निधी मंजूर झाल्यास शहरातील सांडपाण्याची समस्या मार्गी लागू शकेल. हळवल ओव्हरब्रिजचे काम रखडले असल्याने हळवल पुढील काही गावांतील लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीमुळे निधी अभावी हे काम रखडले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आवश्यकता आहे.पर्यटनस्थळांसाठी कृती आवश्यककणकवली शहरात सुसज्ज क्रीडांगण नसल्याने होतकरू युवकांना, मुलांमधील अंगभूत गुणांना वाव मिळत नाही. शहरातील मुडेश्वर मैदानावर क्रीडा संकुल उभारण्याच्या घोषणा आतापर्यंत अनेकदा झाल्या.गोपुरीला उर्जितावस्थेची गरजपू.आप्पासाहेब पटवर्धन यांनी उभारलेला गोपुरी आश्रम हा कणकवली तालुक्याचा ठेवा असून तो दुर्लक्षित राहिला आहे. निधीअभावी आश्रमातील अनेक उपक्रम बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत.आश्रमाला उर्जितावस्था दिल्यास संस्कार, कृषी विकास, श्रमशक्ती, पर्यावरण संवर्धन, ग्रामस्तरावरील स्वयंपूर्णतेचे धडे दिले जाऊ शकतील.
रोजगार देणाऱ्या प्रकल्पांची वानवाच
By admin | Updated: November 10, 2014 23:53 IST