आंबोली : आंबोली, चौकुळ व गेळे परिसरात सध्या रानफुलांचा उत्सव भरला आहे. याठिकाणी निसर्ग पर्यटनासाठी विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांचेही ही फुले लक्ष वेधून घेत आहेत. आंबोली व आजूबाजूच्या गेळे व चौकुळ या गावांमध्ये वातावरण जवळजवळ सारखेच असते. धुके, पाऊस, दऱ्या, निमसदाहरित जंगल, नद्या, ओढे, शेती, राहणीमान सगळं काही सारखंच. ३०० ते ३५० इंच इतका पाऊस याठिकाणी पडतो. जैवविविधतादृष्ट्या संपूर्ण पश्चिम घाटात या तीनही गावांना अनन्य साधारण महत्त्व आहे. या गावामध्ये तब्बल १३९ प्रजातींची रानफुले आढळून येतात. गुलाबी, निळ्या, सफेद, लाल, तपकिरी अशा विविध रंगांमध्ये फुलणारी ही फुले मन मोहून टाकतात.साधारणपणे आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात या फुलांचा बहर येऊ लागतो. ऊन, पाऊस, धुके अशाप्रकारे वातावरण या फुलांच्या बहरासाठी पोषक असते. तेरडा, बुगडी, सांगाडी, तपकी या आणि अशा अनेक गमतीदार नावांनी ही फुले ओळखली जातात. चौकुळ येथील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी या ठिकाणच्या फुलांचा, वनस्पतींचा शास्त्रीय अभ्यास केला आहे. या फुलांसोबत या फुलांवर भिरभिरणारे किटक व फुलपाखरेही मन मोहून टाकत आहे. फुले म्हटली की, सगळ्यांच्या आवडीचा विषय. त्यामुळे तुम्हालाही या फुलांची छायाचित्रे काढण्याचा मोह आवरणार नाही, एवढे मात्र नक्की. (वार्ताहर)
रानफुलांचा महोत्सव पर्यटकांचे आकर्षण
By admin | Updated: September 30, 2014 00:23 IST