कुडाळ : शिवसेना ही दहशतवादावरच चालत असून, मला त्याचा अनुभव आहे. त्यामुळे दहशतवाद संपविण्यासाठी आमदार केसरकर यांनी शिवसेनेत न जाता राष्ट्रवादी पक्षातच राहावे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक किरण पावसकर यांनी कुडाळ तालुका राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात केले.कुडाळ येथील या कार्यक्रमाला पक्ष निरीक्षक किरण पावसकर, मत्स्योद्योग महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष पुष्पसेन सावंत, माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, माजी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, जिल्हा परिषद सदस्या रेवती राणे, अतुल रावराणे, सतीश साळगावकर, रंजन शिर्के, आर. के. सावंत, संतोष कुंभार, सावळाराम अणावकर, बाळ कन्याळकर तसेच तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना पक्ष निरीक्षक पावसकर म्हणाले की, पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांनी एकत्र यावे. या जिल्ह्यात राष्ट्रवादी एक नंबरला आहे. ग्रामपंचायती, नगरपालिका यांच्यावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व अधिक आहे. मालवणचा नगराध्यक्ष हा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आहे, असे सांगून आमदार केसरकरांना पक्षाकडून योग्य तो न्याय मिळेल. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाऊ नये. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाच्या वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय पक्षाच्या संदर्भात पत्रकबाजी करू नका, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. यावेळी पुष्पसेन सावंत तसेच इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)यावेळी उपस्थित काही पदाधिकाऱ्यांनी या जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी न करता स्वतंत्र तीन उमेदवार उभे करून निवडणूक लढवावी अशी मागणी पक्ष निरीक्षक पावसकर यांच्याकडे केली. यावेळी हा निर्णय घेण्यापेक्षा तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा, असे वक्तव्य पावसकर यांनी केले.आम्हाला योग्य सन्मानकाहीजण आमच्या व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दुफळी, वादंग निर्माण व्हावे याकरिता चुकीच्या पद्धतीने पत्रकबाजी करीत आहेत. त्यांचा हा प्रयत्न कधीही सफल होणार नाही. कारण आम्ही राष्ट्रवादीचे सच्चे कार्यकर्ते असून, पक्ष नेतृत्वाकडून आमचा योग्य तो सन्मान होतो व यापुढेही होत राहणार, असे मत माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांनी व्यक्त केले.
शिवसेना दहशतवादावरच चालते
By admin | Updated: July 22, 2014 23:32 IST