मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या बाजूने भरलेला मातीचा भराव किंचित प्रमाणात खचला आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व चबुतरा पूर्णपणे मजबूत, सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. चबुतऱ्याच्या मुख्य रचनेवर किंवा पुतळ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यांच्या भोवतालचा परिसर यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण या विभागामार्फत नियमानुसार सातत्याने करण्यात येते. खचलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून हे काम अत्यंत तत्परतेने या विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.यावेळी अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, उपअभियंता अजित पाटील, मे. राम सुतार आर्ट क्रिएशनचे प्रतिनिधी त्रिविक्रम प्रभुगावकर, स्वातंत्र्य गुणवत्ता सल्लागार सी.एन. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता सुरज गिरी, अभियंता बावणे आदी उपस्थित होते.
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा, परिसराची मुख्य अभियंत्यांनी केली पाहणी, म्हणाले..
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 16, 2025 17:25 IST