प्रकाश काळे - वैभववाडी -शिवबंधनासाठी आतुरलेल्या विविध पक्षांतील कार्यकर्त्यांची तालुक्यात संख्या मोठी असताना लोके, सावंत, रावराणे सेनावासी झाले. त्यामुळे आगामी काळात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोर्इंग होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. यामुळे यंदा शिमग्याआधीच राजकीय धुळवड खेळली जाण्याची चिन्हे आहेत.शिवधनुष्याकडे आकर्षित झालेल्यांना रोखण्यासाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे, तर इनकमिंग वाढण्यास सुरुवात झाल्याने सेनेच्या स्थानिकांमध्ये काहीशी अस्वस्थता जाणवत आहे. त्यामुळे वैभववाडीच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी ‘मातोश्री’वर मंगेश लोके, संभाजी रावराणे, संतोष सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अरविंद भोसले आदी सेना नेते उपस्थित होते.तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सेना प्रवेश निश्चित झाल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आऊट गोर्इंग आमच्याच पद्धतीने होईल, अशी तंबी दिली होती. त्यानंतर कुंपणावरील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हालचाली काहीशा थंडावल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, माजी पंचायत समिती सदस्यांनी आमदार राणे यांच्या तंबीकडे कानाडोळा करीत आज हातात शिवबंधन बांधून घेतले. त्यामुळे हा काँग्रेसला बसलेला पहिला धक्का असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या काँग्रेस प्रवेशानंतर जिल्ह्याच्या राजकारणात त्सुनामी येऊनही मंगेश लोके शिवसेनेत थांबले होते. त्यावेळी मंगेश लोके समजून अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यातून त्यांचे चुलत बंधू गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर २००७ च्या पंचायत समिती निवडणुकीतून मंगेश लोके एकटेच शिवसेनेतून निवडून आले होते. २०११ मध्ये त्यांनी काँग्रेस प्रवेश केला होता. मात्र पंचायत समितीमध्ये पद न मिळाल्याने ते नाराज होते. त्यामुळे गेली दोन वर्षे परतीच्या मार्गावर होते.संदेश पारकर यांच्यासमवेत त्यांच्या समर्थकांनी जानेवारी २०१३ मध्ये काँग्रेस प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाची धुरा पक्षाने संभाजी रावराणे यांच्यावर सोपवली. युवक प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी संभाजी रावराणे यांना संपूर्ण पाठबळ दिले होते. मात्र विधानसभा निवडणुकीपासूनच ते पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. नावळे गावचे सरपंच असलेले संभाजी रावराणे २००६ च्या सुमारास शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झाले होते. आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे.करूळ गावचे सुपुत्र संतोष सावंत यांनीही मनसेला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवबंधन हाती बांधून घेतले आहे. २००६ मध्ये शिवसेनेच्या तालुका संपर्कप्रमुखपदाची धुरा त्यांच्याकडे सोपविली होती. मात्र मनसेच्या स्थापनेनंतर सावंत यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मनसेचे सहसंपर्क प्रमुखपद स्वीकारले. तेव्हापासून अनेक समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न केले, परंतु पक्षनेतृत्वाकडून त्यांच्या कार्याचा सन्मान केला गेला नाही. त्याची सल त्यांच्या मनात विधानसभा निवडणुकीआधीपासून होती. त्यामुळे त्यांनी स्वगृही परतणे उचित मानले. या पक्षप्रवेशामुळे तालुका शिवसेनेला काहीअंशी पुन्हा बळ मिळणार आहे.दोन्ही कॉँग्रेसमधून आऊटगोर्इंग ?कॉँग्रेसमधून लोके, राष्ट्रवादीतून रावराणे व मनसेतून सावंत बाहेर पडून सेनेत दाखल झाल्याने त्या तीन पक्षांचे किती नुकसान आणि सेनेचा फायदा होणार यापेक्षा तिघांच्या बाहेर पडण्याच्या ‘धाडसा’मुळे सेनेच्या मार्गावर असणाऱ्यांचा धीर निश्चित वाढणार आहे. पक्षहानी रोखण्यासाठी कोणता मार्ग अवलंबला जाणार यावर बरेच अवलंबून आहे. शिवसेनेतील वाढती अस्वस्थता संपविण्यासाठी नेतृत्वाला तालुक्यात बळ द्यावे लागणार आहे. यासाठी नेत्यांची कसोटी लागणार आहे.
शिमग्याआधीच राजकीय धुळवड
By admin | Updated: February 2, 2015 00:08 IST