देवरूख : शहरातील मच्छी मार्केट येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अविनाश शिंदे यांनी वारंवार करूनसुध्दा प्रशासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रजासत्ताकदिनी नगरपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन अविनाश शिंदे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस ठाणे व नगरपंचायतीला दिले आहे. नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मच्छी मार्केट याठिकाणी मूलभूत सुविधांतर्गत ग्रामपंचायत अस्तित्त्वात असताना ३० लाख रूपये खर्च करून गाळे उभे करण्यात आले. हे गाळे अनधिकृतपणे उभारले जात असून, ते पाडण्यात यावेत, अशी सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली होती. या सूचनांची अवहेलना करत ग्रामपंचायतीने हे बांधकाम पूर्ण करून गाळे ग्राहकांना भाडेतत्त्वावर दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषानुसार हे गाळे आजही अनधिकृत आहेत. या गाळ्यांवर कारवाई करून त्वरित पाडण्यात यावेत, अशी मागणी एक वर्षापासून शिंदे यांनी उचलून धरली आहे. नगरपंचायत ते जिल्हाधिकारी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालय तेथून सार्वजनिक बांधकाम या कार्यालयाकडून पुन्हा तहसील कार्यालय तेथून नगरपंचायतीला या गाळ्यांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही कारवाईची कोणतीच हालचाल दिसून येत नाही. उलट हे गाळे व्यापारासाठी सुरूच ठेवण्यात आले आहेत. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून हातोडा फिरवला जातो. हेच कार्यालय स्वत:च्या अनधिकृत बांधकामाबाबत उदासीन दिसून येत आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. हेच आदेश केवळ कारवाई न झाल्याने कागदोपत्री राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. २४ जानेवारीपूर्वी या बांधकामावर कारवाई न झाल्यास २६ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामांकडे देवरूख नगरपंचायतीचे दुर्लक्ष
By admin | Updated: January 10, 2015 00:22 IST