कणकवली : नारायण राणे हे गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्याचा मुख्यमंत्री असा संघर्षमय प्रवास करणारे नेतृत्व आहे. वरून काटेरी वाटले तरी अंतःकरणातून ते कोकणी फणसासारखे मऊ आणि दिलदार आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा गौरव केला. कणकवली येथे शुक्रवारी (१० एप्रिल) राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी सोहळ्याप्रसंगी दिग्गज नेत्यांची मांदियाळी जमली होती.
'त्या' चिठ्ठीने दिली प्रेरणा -मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माझ्या संसदीय यशाचे श्रेय राणे साहेबांना जाते. विधानसभेतील माझ्या पहिल्या भाषणानंतर त्यांनी अवघ्या ७ मिनिटांत कौतुकाची चिठ्ठी पाठवून माझा उत्साह वाढवला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. जेव्हा राणे साहेब अर्थसंकल्पावर बोलायचे, तेव्हा एखादा अर्थतज्ज्ञ बोलतोय असे वाटायचे. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे तत्कालीन अर्थमंत्रीही चिंतेत पडायचे.
कोकण विकासाचा ध्यास
फडणवीस म्हणाले, नारायण राणे यांच्या मनात सदैव कोकणच्या विकासाचा विचार असतो. त्यांच्या मेडिकल कॉलेजमधून १५० डॉक्टर बाहेर पडले, हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. त्यांनी सत्तेचा वापर नेहमी गरिबांचे संसार उभे करण्यासाठी केला.
कोकणचा बुलंद आवाज : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, राणे साहेब म्हणजे कर्तृत्वाने 'साहेबांचा शब्द' काय असतो हे दाखवून देणारे झंझावाती नेतृत्व आहे. प्रखर हिंदुत्वाचा विचार ही त्यांची मोठी ताकद आहे. ७४ वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. ते दिसायला कडक असले तरी कार्यकर्त्यांवर लहान भावासारखे प्रेम करणारे सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाबाबत ग्वाही व दिलगिरी
येत्या मे महिन्यापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल," असे आश्वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिले. अनेक वर्षे या महामार्गाचे काम रखडल्यामुळे कोकणवासीयांना जो त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली.
मेहनतीनेच यश शक्य : नारायण राणे
सत्काराला उत्तर देताना नारायण राणे भावूक झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझे दैवत असून त्यांच्यामुळेच मी इथवर पोहोचलो. आयुष्यात मेहनतीच्या जोरावर सर्व काही साध्य करता येते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ७४ व्या वर्षात पदार्पण करताना मिळालेली ही माणुसकी हेच माझे खरे संचित असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये फडणवीस यांच्याशी झालेला संवाद आणि पदाचा मिळालेला सन्मान याचा उल्लेख करत, जनसेवेचे काम अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सोहळ्याला या नेत्यांची उपस्थिती
या सोहळ्याला नीलम राणे, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,उपाध्यक्ष दादा साहील, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिंदेसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, दीपलक्ष्मी पडते,अबिद नाईक, समीर नलावडे, अशोक सावंत, संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश पवार, प्रास्ताविक डॉ. मिलिंद कुलकर्णी तर आभार नितेश राणे यांनी मानले.
Web Summary : Devendra Fadnavis lauded Narayan Rane's journey from humble beginnings to Chief Minister. Gadkari praised Rane's Hindutva and dedication to Kokan's development. Rane credited Balasaheb Thackeray for his success and pledged continued public service. Gadkari promised completion of Mumbai-Goa highway soon.
Web Summary : देवेंद्र फडणवीस ने नारायण राणे के संघर्षमय जीवन की प्रशंसा की। गडकरी ने राणे के हिंदुत्व और कोंकण के विकास के प्रति समर्पण की सराहना की। राणे ने बालासाहेब ठाकरे को अपनी सफलता का श्रेय दिया और जनसेवा जारी रखने का संकल्प लिया। गडकरी ने मुंबई-गोवा राजमार्ग जल्द पूरा करने का वादा किया।