कणकवली : गर्भपिशवीची गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान कसाल-धनगरवाडी येथील जयश्री राजेंद्र शिंगाडे (वय ४०) या विवाहितेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत डॉक्टरांना घेराव घालून इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी नातेवाईकांनी केली. तसेच शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी पैसे घेतल्याचे यावेळी पुन्हा एकदा उघडकीस आले. रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यास घेण्यास नकार देत रुग्णालयासमोर ठिय्या मांडला होता.जयश्री शिंगाडे यांची दहा वर्षांपूर्वी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया झाली होती. गेले वर्षभर त्यांच्या पोटात दुखत असल्याने २१ जानेवारीला त्यांची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफीनंतर गर्भपिशवीला गाठ झाली असून, ती काढण्याचा सल्ला जिल्हा रुग्णालयात देण्यात आला. मात्र, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर पाटील यांनी पगार झाला नसल्याचे सांगत शिंगाडे यांची शस्त्रक्रिया करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिंगाडे कुटुंबीयांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांच्याकडून शस्त्रक्रिया करून घेण्याचे ठरविले. त्यामुळे मंगळवारी दुपारी जयश्री शिंगाडे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी १० वाजता शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. भूलतज्ज्ञ पराग नायगावकर यांनी भूल दिली. गाठ काढून डॉक्टर सोडल यांनी शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडल्याचे सांगितले. मात्र, पुन्हा टाके घालून शिवण्याची प्रक्रिया सुरू असताना शिंगाडे यांचे हृदय बंद पडले. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर काही वेळाने हृदय काम करू लागले आणि पुन्हा पंधरा मिनिटांनी हृदय बंद पडले. त्यातच जयश्री शिंगाडे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी ही माहिती दिल्यानंतर नातेवाइकांना शोक अनावर झाला. तसेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच जयश्री यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे, उपनिरीक्षक मोटे यांच्यासह कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कसाल येथील ग्रामस्थांसह युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप मेस्त्री, नगरसेवक कन्हैया पारकर, आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टरांना घेराओ घातला. उपजिल्हा रुग्णालयातून सोनोग्राफी आणि सीटी स्कॅनसाठी जे रुग्ण बाहेर पाठवले जातात, त्यामागे कमिशन घेतले जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला. भूलतज्ज्ञांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे इनकॅमेरा शवविच्छेदन व्हावे; अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. भूलतज्ज्ञ नायगावकर यांनी कमरेखालच्या भागात भूल दिली होती. त्यामुळे हृदय बंंद पडण्याची शक्यता नाही, असे स्पष्टीकरण दिले. भूल जास्त झाल्यासही हृदयक्रिया बंद पडू शकते, असे अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांनी सांगितले. भूलतज्ज्ञ डॉ. पराग नायगावकर यांचा रक्तनमुना घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार रक्तनमुना तपासणीसाठी घेण्यात आला. (प्रतिनिधी)सोडल यांनी पैसे घेतलेशस्त्रक्रियेसाठी डॉ. सोडल यांनी रुग्णाच्या नातेवाइकांकडून सात हजार रुपये घेतले. याची कबुली डॉ. सोडल यांनी यावेळी दिली. डॉ. सोडल यांची ‘एनआरएचएम’अंतर्गत ओरोस येथे नियुक्ती असून, उपजिल्हा रुग्णालयात एक दिवस आड त्यांना कणकवलीत बोलवले जाते, असे अधीक्षक डॉ. जाधव यांनी सांगितले. शल्यचिकित्सकांची भेटया घटनेच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी जिल्हा शल्यचिकित्सक आर. डी. माने यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत डॉ. सोडल यांनी पैसे घेतल्याचे अधीक्षक डॉ. जाधव यांच्याकडून लिहून घेण्यात आले. काही वेळाने जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनीही भेट देऊन माहिती घेतली.
शस्त्रक्रियेवेळी विवाहितेचा मृत्यू
By admin | Updated: January 29, 2015 00:18 IST