सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादनाच्या नवीन कायद्यानुसार भूसंपादनाची प्रक्रिया राबविली जाणार असून १५ नोव्हेंबरनंतर भूसंपादनाच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. यासाठी केंद्रशासनाने १ हजार कोटीची तरतूद केली आहे. असे सांगतानाच नद्यावरील १२ पुले व रेल्वे पुलांची निविदा प्रक्रिया सुरू असून महिन्याभरात प्रत्यक्ष पुलांच्या कामांना सुरूवात होणार असल्याची माहिती रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.विनायक राऊत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी आज जिल्हाधिकारी दालनात बैठक घेतली. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांच्यासह सर्व संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खासदार राऊत यांनी महामार्ग चौपदरीकरणासह पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि विविध कामांविषयी आढावा घेतला.या बैठकीनंतर बोलताना खासदार राऊत म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीचे भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. भुसंपादनाच्या नवीन कायद्यानुसार भुसंपादनाची प्रक्रिया राबविली जात आहे. ते काम १५ नोव्हेंबरनंतर सुरू करण्यात येणार आहे. यासाठी केंद्राने १ हजार कोटी निधीची तरतूद केली आहे. तसेच महामार्गावरील नद्यांवरील १२ पुले आणि रेल्वे मार्गावरील दोन पुले अशा १४ पुलांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू असून महिनाभरानंतर प्रत्यक्ष पुलांच्या कामांना सुरूवात होणार आहे. ही सर्व कामे मुदतीत पूर्ण केली जातील. अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली.पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत संपूर्ण राज्यात कामे सुरू असून सर्वात निकृष्ठ कामे सिंधुदुर्गात झाल्याचे पहायला मिळत आहे. हे दुर्दैव आहे. यापुढे कुठल्याही योजनेतून काम असले तरी रस्त्याची कामे दर्जेदारच होतील. निकृष्ठ कामे चालणार नाही. निकृष्ठ काम आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. असा इशाराही यावेळी खासदार राऊत यांनी दिली. तसेच या योजनेतील जाचक अटी शिथील व्हाव्यात यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. तरच मंजूर झालेल्या कामांना ३ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष गती दिली जाईल, असे सांगितले.जिल्ह्याची आरोग्य सेवा सुधारावी यासाठी सिद्धीविनायक ट्रस्टमार्फत १0 कोटी निधी मंजूर आहे. मात्र, मागील आघाडी शासनाने याबाबत अनास्था दाखविल्यानेच अद्याप कार्यवाही होवू शकली नाही. येथील ट्रामाकेअर युनिटसाठी ५ कोटी आणि ग्रामीण रूग्णालयाच्या सुधारणेसाठी ५ कोटी असा १0 कोटीचा निधी आहे. या निधीतून लवकरच हा विषय मार्गी लावू असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात माणगाव खोऱ्यात हत्तीचा मोठा उपद्रव आहे. तेथील हत्तींचा प्रश्न सोडविण्यासाठी ६0 लाखाचा निधी अपेक्षित आहे. हत्ती पकडण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून या प्रस्तावाला १५ दिवसात मंजुरी मिळेल. त्यानंतर माणगाव आंबेरी येथे हत्ती हटावचे मुख्य सेंटर उभारण्यात येईल. त्यासाठी १0 लाख निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध झाला आहे.ओरोस नगरपंचायत व्हावी, ओरोस येथे एस.टी. डेपो व्हावा, आठवडा बाजार मार्केट शेड सुरू व्हावी. मालवण बंदरावर शौचालयाची व्यवस्था व्हावी. मालवण येथील भुयारी गटार योजनेचे काम लवकर पूर्ण व्हावे, कुडाळ शहर गटार योजनेच्या कामाला लवकर सुरूवात व्हावी, हळवल येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावावा. गौण खनिज परवाने सुलभतेने मिळावेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि दर्जेदार कामे व्हावीत यासाठी आपले प्रयत्न असून यापुढे दर्जेदार कामे व्हावीत यासाठी आपले प्रयत्न असून यापुढे कोणत्याही कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचे यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले.मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे व्हावे. यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्यापैकी रत्नागिरी येथील उपकेंद्राला मंजुरी मिळाली आहे. तर सिंधुदुर्गात झाराप येथे शासनाची १५ हेक्टर जमीन आहे. तेथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, यासाठी आपले प्रयत्न राहतील. तसेच या केंद्रात पर्यटन आणि हॉटेल हे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले जातील. त्यामुळे त्याचा फायदा येथील तरूण-तरूणींना घेता येणार असल्याचे राऊत म्हणाले. (प्रतिनिधी)
१५ नोव्हेंबरनंतर भूसंपादनाच्या कामाला सुरूवात
By admin | Updated: November 2, 2014 00:42 IST