कुडाळ: नीती आयोगाने राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या स्पेस चॅलेंज २०२१ या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रकल्प अव्वल ठरला आहे. हा प्रकल्प प्रशालेच्या विश्वजीत परीट, चैतन्या सावंत व सार्थक कदम या विद्यार्थ्यांच्या संघाने केला. संपुर्ण देशात ६ हजार ५०० प्रकल्प सादर झाले होते. निती आयोग विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करीत असते. त्यातून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. त्याच धोरणाचा एक भाग म्हणून नीती आणि मिशन आणि सी.बी.एस.सी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवर स्पेस २०१९ ही स्पर्धा आयोजित केली होती. संपूर्ण देशातून ६५०० प्रकल्प या स्पर्धेत सहभागी झाले होते. तज्ञ व्यक्तींच्या काटेकोर परीक्षणातून यातील ७५ विजय प्रकल्प घोषित करण्यात आले आहे. यामधून कुडाळ हायस्कूल, जूनियर कॉलेज मार्फत विश्वजीत परीट (इयत्ता १० वी), चैतन्या सावंत आणि सार्थक कदम (७वी) या विद्यार्थ्यांच्या संघाने या स्पर्धेत भाग घेतला होता. शाळेच्या अटल टिंकरिंग प्रयोग शाळेच्या मार्गदर्शनाखाली अंतरिक्ष तंत्रज्ञान वापरून जंगलातील वणव्यावर नियंत्रण असा प्रकल्प या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केला होता.
यासाठी प्रकल्प शिक्षक योगानंद सामंत, सुजय पाटील, देवदत्त काळगे, अटल मेंटाॅरच्या रश्मी परब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या कामाचे फलित म्हणून ७५प्रकल्पा मधुन या प्रकल्पाची विजेता प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली आहे.या यशाबद्दल कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष भाईसाहेब तळेकर, सहकार्यवाह आनंद वैद्य, सदस्य सुरेश चव्हाण, अरविंद शिरसाट, माजी मुख्याध्यापक का. आ. सामंत, मुख्याध्यापिका शालीनी शेवळे, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक दिनेश आजगावकर, महेश ठाकूर, उपमुख्याध्यापक ज्युं कॉलेज राजकिशोर हावळ, प्रकल्प शिक्षक योगानंद सामंत यांनी सर्वांचे कौतुक केले.