तळवडे : निरवडे-न्हावेली-पेंडूर सीमेवरील बागायतीस आज, सोमवारी सकाळी भीषण आग लागली. यामध्ये १५० एकरांतील काजू बागायतीचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत शेतकऱ्यांची पंधरा हजार काजू कलमे तसेच तीनशे आंबा कलमे जळाली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. आगीचे वृत्त कळताच सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशामक बंब तातडीने मागवला. मात्र, ग्रामस्थांनीच ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, उशिरा घटनास्थळी तहसीलदार सतीश कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. निरवडे गावातील शेतकरी सुधीर मल्हार, सुनील मल्हार, बाबली मल्हार, विवेक मल्हार, चंद्रशेखर मल्हार, नंदा मल्हार, आरती मल्हार, रमाकांत मल्हार, नामदेव परब, लीलावती परब, सुहासिनी परब, रमाकांत मल्हार, सुरेश गोडकर, नामदेव मल्हार, विवेक मल्हार, आनंद परब, न्हावेली (पेंढऱ्याचीवाडी) गावातील शेतकरी विजय नाईक तसेच निरवडे व पेंडूर सीमेवरील ५० कुटुंबीयांच्या सुमारे १५० एकर जागेतील काजू बागायतीचे नुकसान झाले. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. अखेर तिन्ही गावांतील शेतकरी एकत्र आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, घटनास्थळी निरवडे तलाठी स्मिता परब यांच्यासह निरवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत मल्हार व अन्य ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)गतवर्षीच्या आगीच्या नुकसानीची भरपाई अजून नाहीच...निरवडे गावात गेल्या वर्षी २०० ते २५० एकर जागेत आग लागली होती. यात शासनाने ८० लाखांचा नुकसानीचा पंचनामा केला होता; परंतु शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. या आगीत शेतकऱ्यांची आंबा व काजू कलमे जळून भस्मसात झाली होती. एक वर्षानंतरही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. या नुकसानीची पाहणी तहसीलदार, कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी केली होती. तर नुुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्री स्तरापर्यंत निवेदने दिली होती; परंतु त्याची कोणतीही दखल घेतली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेती बागायतीचा विमा उतरवण्यात आला नाही. विमा उतरविला, तरच आग, वादळ, पाऊस अशा नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकते. अशी मोहीम शासनाने सिंधुुदुर्ग जिल्ह्यात अग्रक्रमाने राबविल्यास गरीब शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.
दीडशे एकरांतील काजूबाग खाक
By admin | Updated: January 13, 2015 00:50 IST