विनायक वारंग ल्ल वेंगुर्लेवेंगुर्ले नगरात पाणीटंचाईचे सावट संपते न संपते, तोच शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण होऊन स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गेला महिनाभर शहरातील रस्त्यांवर पूर्वी कचराकुंड्या असलेल्या ठिकाणी आता कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. नगरपरिषदेने कचरा उचलून न नेल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे. शहरवासीयांच्या आरोग्याच्यादृष्टीने घातक ठरणारा कचऱ्याच्या समस्येकडे नगराध्यक्ष, आरोग्य समिती सभापती व मुख्याधिकारी आणि प्रशासन यांचे दुर्लक्ष झाल्याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे तसेच कचऱ्याच्या व्यवस्थापनाची मागणी जोर धरत आहे.सावंतवाडी नगराप्रमाणे स्वच्छ, सुंदर बनविण्याच्या तोंडी बढाया मारणारे वेंगुर्ले नगर परिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांची ती विधाने वाऱ्यावरची ठरली आहेत. पाणी, हवा, स्वच्छता व आरोग्य या सेवा बाबी नागरिकांना मुलभूत व जीवनावश्यक असल्याने त्यावर खर्च करण्याचे अधिकार नगराध्यक्षांना शासनाने राखून ठेवलेले असताना वेंगुर्ले शहरात अनेक ठिकाणी एका महिन्यापासून साठून पडलेल्या कचरा उचलण्यास व निर्मूलनास दखल घेतलेली नाही. नगर परिषदेचे झाडू कामगार प्रत्येकी ८ दिवसांनी ज्या भागात कचरा साफसफाईस जातात. तेथील कचरा जाळून टाकण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यामुळे हवाप्रदूषण होते व कचरा जळेपर्यंत होणाऱ्या धुरामुळे पादचारी नागरिकांसह वाहनधारकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागतो. या समस्येकडे नागरिक डी. के. परब यांनी लक्ष वेधले होते. परंतु प्रशासनाकडे त्याकडे दुर्लक्षच केले. वेंगुर्ले शहरात भटवाडी पेट्रोल पंपनजीक, कॅथॉलिक चर्च, गावडेवाडी रोडसमोर, विठ्ठलवाडी रस्ता, कलानगर, शिरोडा नाका प्रवासी शेड, विलास पडवळ यांच्या घरासमोर, पूर्वस मंदिर बसस्टॉप, तालुका स्कू ल नं. १, आनंदवाडी, राऊळवाडा यासह वाडीवाडीतल्या रस्त्यावर व गटारात कचरा अनेक दिवसांपासून साचून राहिला आहे. आठवडा बाजार भरणाऱ्या भागात खुल्या गटारातूनही दुर्गंधी येत असताना त्याच्या बाजूला भाजीविक्रीच्या व्यावसायिकांना बसण्यास मुभा दिली जाते. या दिवशी भाज्यांचे दर कमी असल्याने नाकावर हात वा रुमाल ठेवूनच ग्राहकांना खरेदी करावी लागते. नगर परिषदेच्या खुल्या मार्केटमध्ये दररोज मालविक्रीस येणारे व्यापारी व खरेदीस येणाऱ्या नागरिकांसाठी मुतारी, शौचालये यांच्या सोयीसुविधांबाबत नगर विकास मंत्री उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करून दिलेला असताना आणि कौन्सिलमध्ये फेब्रुवारी महिन्यात ठराव झाला असताना तब्बल ४ महिन्यानंतरही ही सुविधा पूर्ण करण्यास नगराध्यक्ष आणि प्रशासन अपयशी ठरले आहे. मात्र, मोठेपणाने फिरते शौचालय व मुतारी एक ठेवून सोय केल्याच्या बढाया मारल्या जात आहेत. नगर परिषद जलतरण तलावाच्या काही फर्शी सुटल्या असून त्या दुरूस्त करण्याबाबत जलतरण तलाव चालकाने व नगरसेवक प्रसन्ना कु बल यांनी रितसर मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली असताना त्याकडे नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम आगामी काळात नागरिकांना भोगावा लागणार आहे.
वेंगुर्ले शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर
By admin | Updated: July 1, 2014 00:06 IST