सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणपती उत्सव व नवरात्र उत्सवाचे आयोजित सर्व कार्यक्रम शांततेत पार पडावेत तसेच आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून २७ सप्टेंबरपर्यंत १५ दिवसांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियमन आदेश जारी केला आहे.त्याअर्थी जिल्हा दंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी प्राप्त असलेल्या शक्तीचा वापर करून मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) प्रमाणे २७ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई केली आहे.या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे, कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीची किंवा मृतदेह किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, पाच अगर पाचपेक्षा जादा लोकांनी एकत्र जमा होणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे.ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिदीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना या संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे अशा व्यक्तींना आणि लग्न आदी धार्मिक समारंभ यास नियमन आदेश लागू पडणार नाही.या आदेशाचा जो कोणी भंग करेल तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असेही जिल्हा दंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियमन आदेश जारी
By admin | Updated: September 14, 2014 23:57 IST