रत्नागिरी : कोकण विभागात शेतीचा हंगाम २०१४-१५साठी १५ डिसेंबर २०१४ ते १५ एप्रिल २०१५ या कालावधीत संगमेश्वर तालुक्यातील रांगव लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा व नाल्यामधून रांगव, शेनवडे, चिखली, मासरंग, कडवई या गावांना आणि साखरपा लघु पाटबंधारे योजनेतून कोंडगाव, साखरपा या संगमेश्वर तालुक्यातील प्रकल्पातील गावांना सिंंचनासाठी पाणी पुरवठा प्रस्तावित आहे. पाणीपुरवठा शक्यतो १५ डिसेंबरपासून करण्यात येईल. याअंतर्गत या योजनेचा समावेश क्षेत्रातील बागायतदारांनी पिकाचे पाणी मागणी अर्ज नमुना क्रमांक ७मध्ये पूर्ण करुन ३० नोव्हेंबर २०१४पर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संबंधित सहाय्यक कार्यकारी अभियंता, शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावयाचा आहे. पाणी अर्जाचे कोरे नमुने त्याच कार्यालयात उपलब्ध होतील. या योजनेवरील लाभधारकांनी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पाणी अर्जात काही दुरूस्ती असल्यास त्याची पूर्तता करुन स्वीकृत दिनांकाप्रमाणेच अर्ज सादर करून त्याची संबंधित कार्यालयाकडून पोच घ्यावी.प्राप्त सर्व अर्जांचा पाण्याच्या उपलब्ध साठ्यानुसार क्रमाने मंजुरीसाठी विचार केला जाईल. नैसर्गिक अथवा तांत्रिकदृष्ट्या पाणी पुरवठा करणे अशक्य झाल्यास उभे पीक जोपासण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची राहील. त्यांनी स्वत: तशी तयारी ठेवावी. अन्यथा होणाऱ्या नुकसानास लघुपाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही, असे प्रशासनाने कळवले आहे. पाणी पुरवठ्यात तूट येऊ नये व पीक पूर्णत्त्वास येईपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे, या उद्देशाने शक्यतो १२० दिवसांच्या आत पूर्णत्त्वास येणाऱ्या मुदतीच्या पिकांची आणि कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.पाणी अर्ज मंजूर झाल्याखेरीज पाणी घेऊ नये. पाणी अर्ज सादर केल्यानंतर नियमानुसार पाणीपट्टी भरणे आवश्यक असल्याचे कळवण्यात आले आहे. एकदा मंजूर केलेला पाणी अर्ज रद्द केला जाणार नाही. मंजुरीपेक्षा जास्त पीक केल्यास त्या जादा क्षेत्रात दंडासह (हंगामी दराच्या तीनपट) पाणीपट्टी भरावी लागेल. पाणी वाया घालवल्यास पाणी नाश पंचनामा केला जाईल. पाटाचे पाणी शेवटून वर (टेल टू हेड) या शेतपातळीने घ्यावे लागेल. आकारणी १० गुंठ्याच्या पटीत व जास्तीत जास्त संपूर्ण क्षेत्रात केली जाईल. कालव्याची दुरुस्ती व देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतरच व सिंंचनासाठी पाणी पुरवठा केला जाईल, असेही प्रशासनाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)रांगव प्रकल्पाच्या कालवा व नाल्यामधून रांगव, शेनवडे, चिखली, मासरंग, कडवई या गावांना सिंचनासाठी पाणी.साखरपा योजनेतून कोंडगाव, साखरपा या गावांना सिंंचनासाठी पाणीपुरवठा.पाणी अर्जाचे कोरे नमुने सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात.
लघुपाटबंधारे योजनेतून सिंचनाचे नियोजन
By admin | Updated: November 18, 2014 23:29 IST