चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावर कामथे वांगीपुलाजवळ आज (मंगळवारी) दुपारी १२.३० वाजता दुचाकीने ट्रकला हूल दिल्याने ट्रक थांबला. त्यामुळे मागून येणाऱ्या रत्नागिरी - चिपळूण (क्र. एमएच १४ बीटी २९७२) गाडीने ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यामुळे एस. टी.तील प्रवाशांच्या तोंडाला, कपाळाला गंभीर जखमा झाल्या. १६ प्रवाशांवर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुंबई - गोवा महामार्गावर आज दुपारी वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करीत होते. याच दरम्यान ऋषिकेश आंबवकर या सह्याद्री शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला थांबविण्याच्या प्रयत्नात सावर्डेकडून चिपळूणकडे येणारा ट्रक अचानक थांबला. त्यामुळे मागून वेगात येणारी रत्नागिरी-चिपळूण गाडी ट्रकवर जोरात आदळली. त्यामुळे प्रवासी पुढे लोखंडी बारवर आदळले. या घटनेत काही प्रवाशांचे दात पडले, काहींच्या चेहऱ्याला जखमा झाल्या. काहींचे कपाळ फुटले आणि एकच आरडाओरडा झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी जखमींना रुग्णालयात आणले. बसमधील सीमा संभाजी कदम (२८, सातारा), सिद्धेश श्रीकृष्ण दळी (२०, घोणसरे), धोंडू म्हादू येलोंडे (६०, चिपळूण), संजय गणेश परांजपे (२५, गावखडी), विजय शंकर साळवी (६०), सुरेखा आत्माराम टाकळे (गोवळकोट), प्रिया प्रशांत पवार (२५, पोफळी), महेश गणपत माने (२६, चिपळूण), स्वराज स्वप्नील गुरव (२५, दाभिळ), कृष्णा लक्ष्मण गुरव (८०, दाभिळ), सुजित कानाल (२५, चिखली), दशरथ बाबू पावसकर (६७, पेठमाप, चिपळूण), विजया विजय मोरे (६५, भरणे), विशाल विजय मोरे (२४, भरणे), सुहास नथुराम झगडे (३५, मिरजोळी), माधवी चंद्रकांत लाड (१८, ढाकमोली) यांच्यासह अन्य प्रवाशांवर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर काहींना घरी सोडण्यात आले. ही गाडी व्ही. बी. ठसाळे चालवत होता, तर एम. जी. माने हे चालक होते. चालकही किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार आंबवकर हा जखमी झाल्याने त्याला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, विजय गमरे अधिक तपास करीत आहेत. अपघातातील काही रुग्णांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
जखमींची परवड... चिपळूण - रत्नागिरी एस.टीचा १२.३० वाजता अपघात झाल्यानंतर एस.टी.च्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही ३ तास एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. वाहक माने याला रुग्णांच्या नातेवाईकांनी भांडावून सोडले होते. विविध प्रश्नांच्या सरबत्तीने तो हतबल झाला होता. मात्र, आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना सांगूनही ते दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे जखमींची परवड झाली. विभागीय वाहतूक नियंत्रकांनी याची दखल घ्यावी व एस.टी.चा कारभार सुधारावा अशी मागणी होत आहे.