वैभव साळकर-- दोडामार्ग--कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत सेना-भाजपची सरशी झाली. त्यात काँगे्रस-राष्ट्रवादीला पराभवास सामोरे जावे लागले. याठिकाणी केंद्रात आणि राज्यात युतीचे राज्य असल्याचा फायदा सेना-भाजप युतीला नगरपंचायत निवडणुकीत झाला. शिवाय युतीने दिलेल्या तरुण-तडफदार उमेदवारांकडेच मतदारांचा जास्त कल असल्याचे दिसून आले. याउलट काँग्रेसने दिलेल्या उमेदवारांना मतदारांनी नाकारत युवा लोकांनाच संधी दिली पाहिजे, हा संदेश दिलाच; त्याचबरोबर काँग्रेसला असणारा अतिआत्मविश्वासही नडला आहे. एकंदरीत ही निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली.कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सेना-भाजपसाठी ही निवडणूक आपल्या अस्तित्वासाठी ंिजंकणे गरजेचेच बनले होते. खास करून युतीची केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचा गड आपल्याकडे ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. तर राज्यासह जिल्ह्यात बहुमताच्या सत्तेची उणीव भरून काढण्यासाठी काँग्रेसला ही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे होते.त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. दोन्ही गटांकडून नवखे उमेदवार निवडणूक रिंंगणात उतरविण्यात आले होते. मात्र, सेना-भाजप युतीचे उमेदवार आघाडीच्या उमेदवारांपेक्षा तरुण होते. युवावर्गाला याठिकाणी जास्त प्राधान्य देण्यात आले आणि युवा उमेदवारांकडेच मतदारांचा कल राहिला. प्रभाग क्र. १७ आणि ३ मधील अपक्ष उमेदवारांना केवळ पाच मतांच्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले. यावरून पक्षाचे लेबल असले, तरी ज्याचा जनसंपर्क दांडगा, त्याच्याकडेच मतदारांचा कौल हे यानिमित्ताने प्रकर्षाने दिसून आले. प्रभाग क्र. १ मध्ये मनसेचे रामचंद्र ठाकूर यांना मतदारांनी कौल देऊन मनसेचे खाते खोलले. ठाकूर यांनी निसटता विजय मिळविला असला, तरी त्यांनी आपल्या प्रभागात लोकांच्या केलेल्या कामाची त्यांना पोचपावती मिळाल्याचे राजकीय जाणकार बोलत होते. प्रभाग २ मध्ये वैष्णवी रेडकर या भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या. याठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत त्या तरुण होत्या. येथे मतदारांनी तरुण उमेदवारालाच प्राधान्य दिले. प्रभाग क्र. ३ हा अपक्ष उमेदवाराला मिळालेल्या ३५ मतांमुळे आठवणीत राहील. याठिकाणी रेशमी फुलारी यांना ३५ मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या सेनेच्या उमेदवारास २६, तर विजयी झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारास ४० मते मिळाली. याठिकाणी आपल्या प्रभागात उमेदवाराचा जनसंपर्क किती दांडगा असावा, हे अपक्ष उमेदवाराला पक्षीय लेबल असलेल्या उमेदवारांच्या तुलनेत मिळालेल्या मतावरून दिसून येते. युवा उमेदवारांवर जास्त विश्वासएकंदरीत या निवडणुकीत युवा उमेदवारांवरच मतदारांनी जास्त विश्वास टाकल्याचे दिसून आले. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी साफ नाकारले.प्रचारात झालेला ढिलाईपणा आणि अतिआत्मविश्वास काँग्रेस-राष्ट्रवादीला या निवडणुकीत नडला आणि पराभवाला सामोरे जावे लागले. शिवाय राज्यस्तरीय नेत्यांनीही प्रचाराकडे पाठ फिरवल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला. मनसेने चार जागांपैकी एक जागा जिंकत दोन्ही आघाड्यांत खळबळ माजवून सोडली. काहीही नसताना एका नगरसेवकाची मारलेली बाजी हा दोडामार्गच्या राजकारणातील चंचू प्रवेश मानण्यात येत असला तरी जिल्ह्याच्या राजकारणात मनसेचे अढळ स्थान निश्चित झाले, हे नाकारता न येणारे सत्य दोन्ही आघाड्यांना मान्य करावेच लागेल.
युतीला सत्तेसह तरुण उमेदवारांचा फायदा
By admin | Updated: November 4, 2015 23:59 IST