रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स मशिनव्दारे तिकिटे देण्यात येत असल्यामुळे रत्नागिरी विभागात ७२ लाख ८६ हजार ६८ रुपयांची छापिल तिकिटे शिल्लक राहिली आहेत. ईटीएम मशीन बंद पडल्यास पर्यायी जुन्या तिकीट ट्रेचा वापर करण्यात येतो. मात्र, संबंधित तिकिटे देत असताना मोठ्या रकमेच्या तिकिटांबरोबर छोट्या रकमेची तिकीटे जोडून दिली जातात. परंतु छोट्या रकमेची तिकिटे संपल्यामुळे मोठ्या रकमेची तिकिटे शिल्लक राहिली आहेत.रत्नागिरी विभागात दोन वर्षांपूर्वी ईटीएम मशिनव्दारे तिकीटे देण्यास प्रारंभ झाला. या मशिनवर संबंधित मार्गाची माहिती तसेच प्रत्येक किलोमीटरप्रमाणे तिकिटे व त्यांचे दर याची माहिती असते. त्यामुळे वाहकाला प्रवाशांनी थांब्याचे नाव सांगताच तिकीट देणे सोपे होते. शिवाय हिशेबही ठेवणे सोयीस्कर होत आहे. मात्र, तिकीट ट्रे मधील तिकिटे किती संपली, किती शिल्लक राहिली, याचा हिशेब लिहून त्याप्रमाणे हिशेब द्यावा लागतो. यामध्ये नजरचुकीने कमी अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे तिकीट ट्रे वाहकांना कटकटीचा ठरत होता. मात्र, ईटीएम हाताळणे सोपे व सोयीस्कर वाटू लागले आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तिकिटे संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वाहकांना ईटीएमबरोबर अधूनमधून तिकिटे वापरण्यास सांगण्यात येते. मात्र, जोडून देण्यात येणारी कमी रकमेची तिकिटे शिल्लक नसल्यामुळे मोठ्या रकमेची लाखोच्या घरातील तिकिटे शिल्लक राहिली आहेत.एक रुपयाची सर्व तिकिटे संपली आहेत. २ रूपयांची केवळ ४००, ३ रूपयांची २००, ४ ते ९ रूपयांची शून्य, तर १० रूपयांची केवळ ९०० तिकीटे शिल्लक राहिली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी निम्या आकारात प्रवास सवलत देण्यात येतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या तिकीटापैकी १ रूपयांची ३००, तर २ रूपयांची ५०० तिकीटे शिल्लक राहिली आहेत. या मार्गावरील ८ रुपयांची २८००, १० रुपयांची १६००, तर १२ रुपयांची ३९००, तर १३ रूपयांची ४०० तिकिटे शिल्लक राहिली आहेत.तिकीट ट्रे व त्याचा हिशेब सांभाळण्यापेक्षा ईटीएम मशीन वापरण्यास वाहक प्राधान्य देत आहेत. शहरी मार्ग असो वा ग्रामीण ईटीएम मशीनचा वापर सर्रास होत आहे. ईटीएम मशीन चार्जिंग करावे लागते. त्यामुळे अनेकवेळा मशीन बंद पडण्याचा प्रकार घडतो. परंतु त्यावेळी नाईलाजाने वाहकांना तिकीट ट्रेचा आधार घ्यावा लागतो. मात्र, सध्या कमी रकमेची तिकिटे संपल्यामुळे वाहकांपुढे कोणती तिकिटे द्यावीत, असाही प्रश्न पडत आहे. (प्रतिनिधी)मंडणगड आगारात ३७ लाख १० हजार ४२१, दापोली येथे ४९ लाख ५० हजार, चिपळुणात १४ लाख २० हजार, गुहागर १ लाख ५२ हजार ७५ हजार, देवरूख ५४ लाख २६ हजार २००, रत्नागिरी १७ लाख ७१ हजार २०४, लांजा ७७ लाख २७ हजार ५००, राजापूर २५ लाख ३३ हजार ३०० मिळून एकूण ७२ लाख ८६ हजार ६८ रूपयांची तिकिटे शिल्लक राहिली आहेत.
रत्नागिरी विभागात ७३ लाखांची तिकिटे शिल्लक
By admin | Updated: July 24, 2015 00:40 IST