कोशीय लेखन हे भाषेच्या अस्तित्वाचा प्रधान आणि मूलभूत पाया असतो. भाषेला व्यवहार भाषा, मातृभाषा आणि लोकभाषा म्हणून जे एक अस्तित्व असते, ते ज्ञानभाषा म्हणून परिवर्तित व्हायला कोशीय लेखनाचीच जोड लागते. याच मुख्य प्रेरणेने यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची उभारणी केली. मराठी विश्वकोश हा त्यातील एक बृहद प्रकल्प होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या प्रकल्पाचे सारथ्य केले. मराठी माणसाला सर्वस्तरीय ज्ञान आणि माहिती मराठी भाषेतून मिळावी आणि त्यायोगे भाषा समृद्ध व्हावी हा त्यामागे महत्त्वाचा उद्देश होता. १९६० च्या दशकापासून सुरू असणाऱ्या या प्रकल्पाचे २० संहिता खंड प्रकाशित झाले आहेत.
भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये ज्या २२ भाषांचा उल्लेख आहे, त्या भाषांत मराठी विश्वकोशासारखे सर्वसमावेशक, सर्वविषयक संग्राहक आणि परिभाषायुक्त कार्य झालेले नाही. तर्कतीर्थांनी वैश्विक स्तरावर मान्यताप्राप्त असणाऱ्या एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका या कोशग्रंथाच्या धरतीवर मराठी विश्वकोशाची निर्मिती केली आहे.
तर्कतीर्थांनंतर मे. पु. रेगे, रा. ग. जाधव, श्रीकांत जिचकार, विजया वाड यांनी मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये विशेष योगदान दिले. विजया वाड यांनी शेवटच्या ३ खंडांचे कार्य मोठ्या गतीने करवून घेतले. वाड यांच्याच प्रयत्नातून माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत विश्वकोश अधिक लोकाभिमुख झाला. १९६० च्या दशकापासून गेली सहा शतके विश्वकोश निर्मिती मंडळाचे हे कार्य सुरू आहे.
चौकट :
साताऱ्यातील शाहूपुरीमध्ये मराठी साहित्य परिषद शाखा सुरू झाल्यानंतर मराठी भाषा दिन, महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा, लेखक तुमच्या भेटीला, मराठी वाङ्मय मंडळ असे उपक्रम सुरू झाले. शाहूपुरी शाखेने साहित्याच्या व्यासपीठावरून सामाजिक कार्यास मदत देऊन नवीन पायंडा पाडला. आजच्या युवा पिढीपर्यंत साहित्य पोहचणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन साहित्यिक तयार होण्यास मदत होईल. या संकल्पनेतूनच शाखेने रयत शिक्षण संस्थेबरोबर तीन वर्षांचा सामंजस्य करार केला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मसाप, शाहूपुरी शाखेने पुढाकार घेतला. मसाप कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडहिकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मराठीला अभिजातचा दर्जा मिळावा यासाठी मसापचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी लढा हाती घेतला. पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्रे पाठवण्यात आली.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना करून आंदोलकांद्वारे सातारकरांचा आवाज दिल्लीत घुमला. या प्रार्थना आंदोलनाची दखल घेऊन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मराठीला अभिजात दर्जा लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
-पी. एस. भिलारे (वाई)