सांगली : सिंचन योजनेच्या एकूण बजेटपैकी पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा निधी अद्याप मिळालेला नाही. एक वर्षाच्या कालावधित केवळ अडीच कोटी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आपल्या हक्काचा निधी गेला कुठे?, असा सवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. निधी आणण्यात भाजपचे खासदार, आमदार कमी पडल्याची टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले की, सिंचन योजनांसाठी राज्याच्या एकूण बजेटपैकी पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला २६ टक्के रक्कम येणे अपेक्षित आहे. वर्षभरात केवळ अडीच कोटीच मिळाले. जिल्ह्यातील खासदार, आमदार याबाबतीत कुठे तरी कमी पडत आहेत, असे दिसते. एआयबीपी (वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम) अंतर्गत जिल्ह्यातील योजनांसाठी मिळणारे २00 कोटी अन्य योजनेतून मिळावेत, यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. ८0 कोटींऐवजी थेट २०० कोटींची मागणी केंद्र सरकारकडे करायला हवी. पश्चिम महाराष्ट्राने कधीही कोणत्याही विभागाचा निधी लाटलेला नाही. विदर्भ, मराठवाड्याच्या वाट्याचे पैसे कधीही घेतले नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यांना सिंचनाच्या निधीपासून वंचित ठेवण्याचे कारण नाही. सर्व अनुदान योजना व एआयबीपीसुद्धा नव्या सरकारने बंद केल्या आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यातील सरकार नेमके कोणाचे?, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)मनपाला निधीच नाहीआपण मंत्री असताना सांगली व मिरजेत भाजपचे आमदार होते. आता खासदारांसह या दोन्ही शहरात भाजपचे आमदार आहेत. तरीही महापालिकेला एक रुपयाचा निधी मिळालेला नाही. शहरांच्या विकासासाठी एकही नेता पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पश्चिम महाराष्ट्राचा निधी कोठे गेला?
By admin | Updated: October 30, 2015 23:20 IST