सातारा : ‘धोम-बलकवडी’ प्रकल्पातून रब्बीसाठी चार रोटेशनमध्ये पाणी सोटण्याची तरतूद असली तरी, यंदा पाणी टंचाईमुळे केवळ दोनच रोटेशन करण्याचा निर्णय शुक्रवारी विश्रामगृहातील बैठकीत घेण्यात आला. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या बैठकीत पाणीवाटपाबाबत अनेक विषयांवर गंभीर चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची उपस्थिती होती. धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे वाई, कोरेगाव, फलटण या तिन्ही तालुक्यांत चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मकरंद पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना लोकभावना सांगितली. ‘धरणांत अत्यल्प पाणीसाठा राहिला असल्याने चिंतेचे वातावरण असल्याने धोम-बलकवडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे अत्यंत काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. कृष्णा नदीवर बहुतांश गावांच्या पाणी योजना आहेत. नोव्हेंबर महिन्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याने जानेवारीपासून असंतोषाचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. धोम धरणात पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा ठेवून पाटात सोडलेले पाणी योग्य कारणासाठी वापरले जाणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवून पाणी सोडावे.’ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीही पोटपाटांच्या गळत्या काढून घेण्याच्या सूचना केल्या. पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
‘रब्बी’साठी फक्त दोन वेळा पाणी!
By admin | Updated: October 30, 2015 23:30 IST