तांबवे : ‘ग्रामीण भागातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गृह अलगीकरण बंद करून गावागावात ग्रामपंचायतींनी शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करावेत,’ अशा सूचना प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिल्या. सुपने (ता. कऱ्हाड) येथे तांबवे जिल्हा परिषद व सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची बैठक आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, मंडल अधिकारी पंडित पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा हुंदरे, डॉ. सुशांत सावंत, विस्तार अधिकारी कोळी यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.
प्रांताधिकारी दिघे यांनी सांगितले की, प्रत्येक ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी लागणारा खर्च १५ व्या वित्त आयोगातून करावा. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी लोकसहभागातून किवळ, तळबीड येथे कक्ष सुरू केले आहेत. त्यांचा आदर्श घ्यावा. गावातील डॉक्टरांना तेथील लोकांची काळजी घेण्यास सांगावे, असे सांगितले.
गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी १५ व्या वित्त आय़ोगातील निधीतून विलगीकरण कक्षाचा खर्च करावा, असे सांगितले. गावोगावी विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींना शासनाने आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आय़ोगाबरोबरच या कक्षातील खर्चासाठी शासनाने स्वतंत्र निधी तातडीने उपलब्ध करावा, अशी मागणी तांबवेचे उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील यांनी केली. सरपंचांनी विलगीकरण कक्षातील अडचणी यावेळी मांडल्या. अधिकाऱ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले.
===Photopath===
280521\20210528_130624.jpg
===Caption===
सुपने ता.कराड येथे सरपंच ,ग्रामसेवक, तलाठी यांना माहिती देताना प्रांताधिकारी उत्तम दिघे व इतर मान्य वर