सातारा : ‘उरमोडी धरणाच्या डाव्या कालव्यातून उद्या, शनिवारी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा तालुक्यातील सुमारे ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे,’ अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.उरमोडी नदीच्या डाव्या तीरावरील क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी उरमोडी डाव्या प्रवाही कालव्याचे काम करण्यात आले आहे. सातारा डावा कालवा एकूण १५ किलोमीटर लांबीचा असून, काही प्रकल्पग्रस्तांनी विरोध केल्याने कालव्याचे काम रखडले होते. मात्र, आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मध्यस्थीने समझोत्यातून कालव्याचे काम मार्गी लागले. दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्या दूरदृष्टीतून कृष्णा नदीच्या उरमोडी या उपनदीवर ९.९६ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आले होते. त्यानंतर अनेक अडचणींवर मात करून धरणाचे काम २०१० मध्ये पूर्णत्वास नेले. आता धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत आहे. धरणातील पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी डाव्या कालव्याचे काम मार्गी लागले असून, उजव्या कालव्याचे कामही प्रगतिपथावर आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ‘अंबवडे ते वळसे’ला हरितक्रांतीचे वेध !या कालव्यामुळे सातारा तालुक्यातील अंबवडे बु., भोंदवडे, अंबवडे खुर्द, डबेवाडी, जकातवाडी, शहापूर, सोनगाव, शेंद्रे, वळसे, आदी गावांतील सुमारे ९०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. याच कालव्यावर भोंदवडे येथून उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली असून, या योजनेद्वारे अतिरिक्त ९०४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
उरमोडी कालव्यातून उद्या पाणी सुटणार !
By admin | Updated: April 7, 2016 23:50 IST