गत चार दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यामुळे शेतकरी आधीच हैराण झाले होते. त्यातच गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने परिसरातील शामगाव, अंतवडी, रिसवड, पाचुंद, मेरवेवाडी, वाघेरी, करवडी आदी गावांना झोडपल्याने शाळू पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांवर अवकाळी संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार आहे.
शामगावच्या शिवारातील सुमारे तीस टक्के पिके पावसाने भुईसपाट झाली आहेत, तर अंतवडी, पाचुंद, मेरवेवाडी, वाघेरी, आदी गावांमध्ये सुमारे दहा टक्के नुकसान झाले आहे. तसेच या गावांमध्ये शाळू, गहू, हरभरा या पिकांच्या काढणीस सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांनी पिके काढून टाकली आहेत. त्या पिकांचे भिजल्याने नुकसान झाले आहे.
परिसरात यावर्षी पेरणी लवकर झाली होती. तसेच पोषक वातावरणामुळे पिकांची वाढ जोमाने झाली होती. त्यामुळे भरपूर उत्पन्न होणार या आशेने शेतकरी सुखावले होते. मात्र, अवकाळी पावसाने त्यांच्या सर्व अपेक्षा मावळल्या आहेत. शामगाव येथील पिके जमीनदोस्त झाली आहेत. परिसरात अवकाळी पाऊस मागास पेरणी झालेल्या पिकांसाठी वरदान ठरला आहे, तर काढणीस आलेल्या पिकांसाठी नुकसानकारक ठरला आहे. माळरानावरील पाणी नसलेले शाळू आता काढणीस आले आहेत. ते भिजल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
फोटो : २०केआरडी०२
कॅप्शन : शामगाव (ता. कऱ्हाड) येथे काढणीस आलेले शाळू पीक अवकाळी पावसाने भुईसपाट झाले आहे.