आगाशिवनगरात रस्त्यावरील पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. मलकापुरातील नागरिकांनी पोलिसांसह पालिकेकडे अनेक लेखी तक्रारी केल्या आहेत . या सर्व तक्रारींचा विचार करून पालिकेने अतिक्रमण हटविण्याचा विषय गांभीर्याने घेतला होता. कोल्हापूर नाका ते नांदलापूर हद्दीपर्यंत दोन्ही उपमार्गावर व कराड-ढेबेवाडी रस्त्यालगत अनेक विनापरवाना हातगाडे, वाहनातून रस्त्यांवरच व्यवसाय करत आहेत. काही ठिकाणी फुटपाथवर दुकाने तर रस्त्यावर पार्किंग होत असल्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी व अपघात घडले आहेत.
------------------------------------
शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट
कराड:
कराडला विद्यानगरी म्हणून ओळखले जाते. येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबर अनेक महाविद्यालये आहेत . विविध संस्थांच्या दालनात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी ते कराडमधून विद्यानगरला दररोज ये-जा करतात. एसटीअभावी शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यांना पायपीट करावी लागत आहे.
----------------
दुभाजकातील झाडे वाळली, गवत वाढले
मलकापूर:
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कराड-ढेबेवाडी रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम झाले. यावेळी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दुभाजकांची निर्मिती करण्यात आली. या रस्त्याचे काम केलेल्या कंत्राटदाराने देखभाल दुरूस्ती करण्याची मुदत काही दिवस होती. ती मुदत संपल्यानंतर रस्त्याच्या देखभालीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. हळूहळू दुभाजकातील झाडे वाळत गेली तर पावसामुळे गवत वाढत गेले. महिला उद्योग ते चचेगाव परिसरात गवत वाढल्याने व मोडतोड झाल्यामुळे दुभाजकांची दुरवस्था झाली आहे.