वाई : वाईच्या काही भागांत अतिवृष्टीमुळे
घरे, जमीन, रस्ते यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन सार्वजनिक सुविधांचेही नुकसान झाले. दुर्गम भागातील बहुतांश गावांना डोंगरातील नैसर्गिक झऱ्यातून पाइपलाइनच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा केला जातो.
गोळेगावला क्षेत्र महाबळेश्वरवरून डोंगरातून चारशे मीटर पाइपलाइन करून वर्षभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; परंतु अतिवृष्टीमुळे पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. गोळेगावचे पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन भूस्खलनमध्ये वाहून गेली आहे. ही अडचण दूर करण्यासाठी गोळेगाव-गोळेवाडीचे उपसरपंच जितेंद्र दिलीप गोळे यांनी पंकज जुनंझ्या, पुणे यांना पाइपसाठी विनंती केली होती. गोळेगाव गावच्या पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन पंकज जुनंझ्या यांनी गोळेगाव गावासाठी एक हजार फूट दीड इंची पाइप दिले, तसेच नरेंद्र सिंग मनराल आणि
इंदू नरेंद्र मनराल (सणस) यांच्याकडून गोळेवाडी ज्ञानेश्वरवाडीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रॅव्हिटी लाइनकरिता सव्वा इंची दीडशे मीटर पाइप देण्यात आले. यामध्ये धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाई उप इंजिनिअर अरीकर यांचे विशेष सहकार्य मिळाले. गोळेगावमधील सर्व ग्रामस्थांनी पंकज जुनंझ्या, उपसरपंच जितेंद्र गोळे आणि धोम-बलकवडी प्रकल्प विभाग वाई यांचे कौतुक केले.