सातारा : जिल्ह्यात सध्या वातावरणात वारंवार बदल होत असून, साताऱ्यात तर बुधवारी दिवसभर उकाडा जाणवला. तर सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही भागात वारे सुटून पावसाचे थेंबही पडले.
जिल्ह्यात सध्या किमान आणि कमाल तापमानही वाढत चालले आहे. त्यामुळे थंडी गायब झाली आहे. दुपारच्या सुमारास ऊन पडत असल्याने उकाडा वाढला आहे तर काहीवेळा ढगाळ वातावरणही तयार होते. यामुळे काही भागात हलकासा पाऊसही पडत आहे. अशा विचित्र हवामानाचा लोकांना सामना करावा लागत आहे.
बुधवारी दिवसभर तर सातारा शहर व परिसरात ऊन चांगलेच पडले होते. त्यामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र, सायंकाळी चारनंतर वातावरण बदलत गेले. काही भागात वारा वाहू लागला. त्यामुळे घरावरील पत्रे वाजू लागले. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले. हळूहळू पावसाचे थेंब पडू लागले. त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी होऊन गारवा निर्माण झाला होता.
.........................................................................