फलटण : फलटण-पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यातील राजुरी येथील सुरभी हाॅटेल व साधुबुवा मंगल कार्यालयासमोर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व कार यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. मोहन महिपती कदम, जितेंद्र उत्तम रणवरे अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत बरड पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच ४२ एएफ ६५१८) रविवार, ३१ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास ऊस घेऊन फलटण येथील स्वराज साखर कारखान्याकडे निघाला होता. तर फलटणकडून नातेपुतेच्या दिशेने चाललेली इंडिका कार (एमएच ४२ ए २४८२) या गाडीतील चालक यांनी चुकीच्या दिशेने जाऊन राजुरी येथील सुरभी हाॅटेलसमोर ट्रॅक्टरला समोरून जोरदार धडक दिली. त्यामध्ये मोहन महिपती कदम (वय ५५, रा. कुरवली, ता. इंदापूर) व चालक जितेंद्र उत्तम रणवरे (४५, रा. सणसर, ता. इंदापूर) दोघे गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबतची तक्रार कदम यांचे मेव्हणे तेजस विष्णू यादव (रा. राजुरी, ता फलटण) यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक संजय बोंबले तपास करत आहेत.