सातारा : वाई येथील कृष्णा काठच्या महागणपती मंदिरात पाणी शिरले. भाविकांसाठी दर्शन बंद झाले असून, तीन वर्षांनंतर प्रथमच ‘कृष्णामाई’ दुथडी भरून वाहू लागली. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील सात धरणांमधून जवळपास पाऊण लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने साताऱ्याच्या स्मशानभूमीतही पाणी शिरले.वाईचे महागपती मंदिर दोन फूट पाण्यात असून, मंदिरा समोरील पूलही पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाई शहरातील सर्व वाहतूक जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून सुरू आहे. धोम-बलकवडी धरणातून १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले असून, कृष्णा नदीतील सर्व जलपर्णीही वाहून गेली आहे.दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर शनिवारीही कायम असून, धरणात ८२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण व्यवस्थापनाने कोयनेच्या पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यास शनिवारी सकाळी सुरुवात केली. २,१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. दरम्यान, कोयना नदीतील पाणीपातळी वाढल्याने संगमनगर धक्का पूल शनिवारी दुपारपासून पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पुलापलीकडील ३३ गावे संपर्कहीन झाली आहेत. (प्रतिनिधी)
वाईच्या महागणपती मंदिरात दोन फूट पाणी
By admin | Published: August 07, 2016 12:13 AM