सातारा : ‘माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीही केले नाही. मात्र, आता त्याच शेतकऱ्यासाठी ते रस्त्यावर आले आहेत. आपण दहा वर्षांत शेतकऱ्यांसाठी काहीच केले नसल्याचे कबूल केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून त्यांना पाठिंबा देईल,’ असे आश्वासन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिले. सातारा येथे पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘स्वाभिमानी संघटनेने नेहमीच शेतकऱ्यांचा विचार करून आंदोलन, मोर्चे, निदर्शने केली आहे. सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांच्या हितासाठीच मागण्या राहिल्या आहेत. पवारांच्या काळातच स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशी मान्य करण्याचा विषय झाला होता. मात्र, त्यांनी या आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत. त्याच आयोगाच्या शिफारशी मान्य करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. कृषिमंत्री असताना हे दौरे काढले असते तर शेतकऱ्यांचे काही तरी भले झाले असते.’ शेट्टी म्हणाले, ‘कारखानदारांची परिस्थिती असूनही ‘एफआरपी’ देण्यात आला नाही. यामध्ये कारखानदारांनी राजकारण करून शेतकऱ्याला सरकार विरूध्द भूमिका घेण्यास भाग पाडले जात आहे. ‘एफआरपी’ देण्यासाठी शासनाने ६ हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर करूनही ‘एफआरपी’ देण्यात आलेला नाही. राज्यात २ हजार ९६० कोटी एफआरपी आणि २,०५० कोटी व्याज अशी एकूण रक्कम सहा हजार कोटींच्या घरात आहे. त्यासाठी कारखानदारांनी बँकांमधून कर्ज काढून शेतकऱ्यांची बिले भागवावी.’ आक्रमकतेपेक्षा चर्चेतून प्रश्न सुटतात. या माध्यमातूनच प्रश्न मार्गी लावले जात आहे. एक किंवा दोन वर्षांसाठी शेतकऱ्यांचे नेतृत्व करायचे नसून दीर्घकाळ शेतकऱ्यांचे नेतृत्व करून त्यांच्या हिताचा विचार करणार आहे. यासाठी आक्रमकपणा कमी केला आहे. चर्चेतून मागण्या मान्य केल्या जात आहेत,’असेही यावेळी शेट्टी म्हणाले. (प्रतिनिधी)
पवारांनी कृषिमंत्री असताना दौरे काढायला हवे होते : शेट्टी
By admin | Updated: August 25, 2015 23:52 IST