सातारा/खंडाळा : सातार्यासह कºहाड, फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर तालुक्यांना आज, मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपून काढले. खंडाळा तालुक्यातील धावडवाडीत वीज पडल्याने दोघे, तर कलेढोण (ता. खटाव) येथे एक मेंढपाळ असा तिघांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील हरळी येथील शिंदे यांच्या मालकीची शेतजमीन अहिरे-घाटदरे रस्त्यावर धावडवाडी हद्दीत आहे. तेथे टोमॅटोची बांधणी करण्याचे काम सुरू होते. या परिसरात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. याचवेळी शेतात काम करीत असलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये शेतमालक निखिल चंद्रकांत शिंदे (वय २२, रा. हरळी) व द्वारकाबाई तुकाराम बिचुकले (५५, रा. बिचुकले मळा, अहिर) यांचा मृत्यू झाला. दोघांनाही खंडाळा येथील ग्रामीण रुणालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व खंडाळा पंचायत समितीचे सदस्य रमेश धायगुडे-पाटील, तहसीलदार शिवाजीराव तळपे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन नातेवाइकांचे सांत्वन केले. (प्रतिनिधी) खटाव तालुक्यात मेंढपाळाचा मृत्यू वडूज : खटाव तालुक्यातील कलेढोण येथील मेंढपाळ मच्छिंद्र किसन शिरतोडे (वय ५२) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कलेढोण येथील दबडे मळा नावाच्या शिवारात काही मेंढपाळांसोबत मच्छिंद्र शिरतोडे मेंढरे चरण्यासाठी गेले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक वीज गडगडल्याने सर्व मेंढपाळ एका झाडाखाली थांबले. याचवेळी, मच्छिंद्र शिरतोडे यांच्या मेंढ्या कळप सोडू लागल्याने त्यांना एकत्रित करण्यासाठी मच्छिंद्र शिरतोडे झाडाखालून निघाले असता एकदम विजेचा लोळ त्यांच्या अंगावर आला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. मच्छिंद्र शिरतोडे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.
वीज पडल्याने तीन ठार
By admin | Updated: May 27, 2014 23:10 IST