वाठार स्टेशन : हागणदारीमुक्त गाव या संकल्पनेतून ग्रामीण भागात शौचालय वापराबाबत शासनाने जागृत भूमिका घेतली असून यासाठी कोरेगाव पंचायत समितीमार्फत गेल्या दोन दिवसांपासून गुडमार्निंग पथक कार्यरत करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात या पथकाने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील पिंपोडे बुद्रुक गटात आसनगाव, सोनके, सोळशी, नांदवळ या गावातील ७ लोकांना पकडले व समज देऊन सोडून देण्यात आले. गुडमॉर्निंग पथकाने देऊर, पिंपोडे बुद्रुक, दहिगाव, तडवळे या गावांतील १६ जणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात हजर केले. याच दरम्यान वाठार पोलिस ठाण्यात रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवळे यांनी पथकातील विस्तार अधिकारी घारे यांना या भागातील दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती देत आधी या भागाचा पाणीप्रश्न सोडवा मगच लोकांवर कारवाई करा, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने घारे यांनी तक्रार देण्याचे टाळले. पोलिसांनी सोळा जणांना समज देऊन सोडून दिले. शासन शौचालय बांधण्यासाठी जरी अनुदान देत असेल तरी मिळत असलेल्या अनुदानात शौचालय पूर्ण होत नाही. दुष्काळी भागातील गावांना शौचालयासाठी मुबलक पाणी देण्याचे काम ग्रामपंचायतींनी करावे, अशीच ग्रामस्थांची भूमिका आहे. (वार्ताहर)गेल्या वर्षी वाठारस्टेशनमध्ये गुडमॉर्निंग पथकावर सरपंचांनीच हल्लाबोल केला होता . यामागे गावचा पाणीप्रश्न हाच मुद्दा होता. याची पुनरावृती करण्याची वेळ आणू नये. पाणी प्रश्न सोडवा मगच कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर देण्याची आमची भूमिका राहील. - अमोल आवळे, जिल्हा उपाध्यक्ष, रिपाइं शासनाचा शौचालयसक्ती हा उपक्रम स्तुत्य आहे. आम्ही याचा आदर करतो; परंतु ज्या पध्दतीने गुडमॉर्निंग पथक या लोकांना दमदाटी व अरेरावी करत आहे, हे योग्य नाही. - संभाजी कदम, ग्रामस्थ, देऊर
पाणीप्रश्न सोडवा; मगच गुडमॉर्निंग पथक फिरवा!
By admin | Updated: October 30, 2015 23:21 IST