सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव शहरात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून जयंतीनिमित्त वैचारिक मंथन झाले. व्याख्याने झाली अन् भीमगीतांच्या मैफलीही रंगल्या. दि. १४ एप्रिल रोजी सकाळी नगरपालिकेजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटनांनी पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली. शहरातील विविध पेठांमध्ये चौका-चौकांमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या मूर्ती व प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आकर्षक सजावट करण्यात आली होती. जयभीम फेस्टिव्हल संयोजन समितीच्या वतीने यंदा वैविध्यपूर्ण कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये मनोरंजनाबरोबरच नागरिक जागरुकता अभियान, पोस्टर प्रदर्शन, रस्त्यावर वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, लेक वाचवा अभियान याबाबत जनजागृती करणारे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. ‘सत्यशोधक महात्मा’ नाटकाच्या माध्यमातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला. ‘मी सावित्री’ हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. दि. १३ रोजी भीमगीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी रात्री बारा वाजता जयंतीनिमित्त फटाक्यांची आतषबाजी करत ‘जयभीम’चा जयघोष करण्यात आला. मंडळांनी विविध ठिकाणाहून भीमज्योत आणल्या. (प्रतिनिधी)
चौका-चौकांत घुमला ‘जयभीम’चा नारा
By admin | Updated: April 15, 2015 00:18 IST