सातारा : साताऱ्याला वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इतिहासाच्या अनेक खुणा शहर परिसरात आजही दिसतात. ज्या पाहताक्षणी ऊर अभिमानानं भरून येतो. शौर्याची साक्ष देत शेकडो वर्षे भक्कमपणे उभा असलेला अजिंक्यतारा किल्ला तर साताऱ्याचं भूषण आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनित झालेला हा किल्ला सोमवारी रात्री तरुण सातारकरांच्या दीपोत्सवानं उजळून गेला. निर्मिती सोशल ग्रुपच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून तुळशी विवाहाच्या पहिल्या दिवशी अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाही हा सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याचे नियोजन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. सोमवारी सकाळी अकरा वाजता गु्रपच्या कार्यकर्त्यांनी अजिंक्यतारा किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी व परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर या सोहळ्यासाठी प्रवेशद्वारासमोर ठेवलेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सायंकाळी मशाल आणि पणत्या प्रज्वलित करण्याची तयारी पूर्ण झाली; एवढ्यात पाऊस सुरू झाला. मात्र, नाउमेद न होता कार्यकर्त्यांनी प्रवेशव्दाराजवळील जोत्यात आसरा घेऊन मशाली पेटविण्यास सुरूवात केली. या मशालींच्या लखलखत्या प्रकाशात उजळून गेलेल्या शिवमूर्तीचे दर्शन घेताना सारेच कायकर्ते भारावून गेले.यंदा ग्रुपने प्लास्टिक हटाव मोहिमेतही सक्रिय सहभाग घेतला असून स्वच्छता मोहीम तसेच दीपोत्सवासाठी जमलेल्या लोकांना गु्रपच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष इम्रान मोमीन, उपाध्यक्ष राहुल आग्रवाल यांच्यासह जवळपास शंभर कार्यकर्ते यासाठी प्रयत्न करत असतात. यामध्ये सुशिक्षित आणि नोकरदार मंडळींचाही मोठा सहभाग आहे. अमित काळे आणि अमर बनसोडे मित्र समूहाचेही यासाठी सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)शंभर कार्यकर्त्यांचे किल्ल्यावर श्रमदान--निर्मिती सोशल ग्रुपच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी सोमवारी अजिंक्यतारा किल्ल्यावर श्रमदान करून साफसफाई केली. यामध्ये सुशिक्षितांबरोबरच नोकरदारांचा सहभाग होता. किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी व परिसराची स्वच्छता करण्यात आली. यंदा मोठ्याप्रमाणात सोहळा..गेल्या काही वर्षांपासून तरुण सातारकर एकत्र येऊन साताऱ्याच्या उज्ज्वल इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावर होणारा दीपोत्सव त्याचाच भाग आहे. मात्र, दरवर्षीपेक्षा यंदा हा दीपोत्सव मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय घेऊन शंभर कार्यकर्त्यांनी शंभर मशाली तयार करून त्या किल्ल्यावर पेटविल्या. तर तटबंदीवर दोनशे पणत्याही प्रज्वलित करण्यात आल्या आहेत. यासाठी दहा किलो तेल लागले.
शिवमूर्तीच्या साक्षीनं उजळला अजिंक्यतारा!
By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST