सचिन जवळकोटे ल्ल साताराकधीकाळी मुंबईत स्थायिक झालेला ‘जावळीचा सुपुत्र’ जेव्हा पाच वर्षे ‘आम्ही कोरेगावकर’ म्हणून रुबाबात मिरवतो, तेव्हा ‘ल्हासुर्णेचा बंगला’ भविष्यातही कोरेगावचा राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाऊ शकतो... हे ओळखून विरोधकांनी सुरू केलीय आतापासूनच एकजुटीची हालचाल.सधन पट्ट्यातील मुत्सद्दी नेत्यांचा संवेदनशील मतदारसंघ म्हणून कोरेगावची ओळख. सध्या शशिकांत शिंदेंच्या रूपातून जिल्ह्याचं नेतृत्व असा हा कोरेगाव करतोय. गेल्या विधानसभेला ‘परका उमेदवार’ म्हणून शिंदेंचा प्रचार केला गेला असला तरी शालिनीतार्इंचं ‘वक्तृत्वकौशल्य’ शिंदेंना खूप लाभदायी ठरलं. आरक्षणाची भूमिका मांडताना नेहमीप्रमाणं तार्इंच्या तोंडून सुटलेले वाक्बाण अनेकांची मनं दुखवून गेले. झालं. व्हायचा तोच परिणाम झाला. जावळीच्या वाघानं कोरेगावचंही मैदान मारलं. त्यानंतर तार्इंच्या हातातून जरंडेश्वर कारखानाही सुटला. ‘पत्रकार परिषदांमध्ये फाडफाड बोलणं वेगळं अन् कारखान्याचं मॅनेजमेंट चालवणं वेगळं’ हे समजे-उमजेपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली. अजितदादांच्या ‘गुरु’नं कारखाना ताब्यात घेतलेला. याच काळात शिंदेंनी अत्यंत सावधपूर्वक तालुक्याच्या राजकारणात पावलं टाकली. एकेक गाव पालथा घातला. जुने शत्रू जोडून घेतले. साऱ्याच गटांशी संपर्क ठेवला. दरम्यान, जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांमध्ये ‘राष्ट्रवादी’च्या ‘घरभेदीं’नी कुठं-कुठं सुरूंग लावले, याची बित्तंबातमी मीठमसाला लावून ‘बारामती’करांपर्यंत पोहोचविण्यात आली. मग काय... पालकमंत्रिपद अलगदपणे कोरेगावच्या पदरात पडलं. ‘या जिल्ह्याच्या विकासाचे कर्ते-करविते आम्हीच!’ अशा राणा भीमदेवी थोटात उद्घाटनांची नारळं फोडणाऱ्या ‘राष्ट्रवादी’ नेत्यांची गोची मुख्यमंत्री बदलानंतर झाली. गेल्या दोन वर्षांत पृथ्वीराज चव्हाणांनी विकासनिधींचा धुमधडाका लावताच ‘राष्ट्रवादी’ नेत्यांच्या हातातल्या कुदळी-फावडी गळून पडल्यात. कोरेगाव तालुक्यातल्या काँग्रेस नेत्यांना तर भलताच चेव आलाय. धामणेरहून विजयराव कणसे कोरेगावात डेरेदाखल झालेत. तिकडून गोरेंनी अंगुलीनिर्देश करताच किरण बर्गेही बाह्या सरसावून पुढं सरसावलेत. पुसेगावातही सुरेश जाधवांना उत्साह आलाय. काँग्रेसमध्ये उत्साही उमेदवारांची मांदियाळी झाली असली तरी भाजप-सेनेच्या छावणीत मात्र पुरती शांतता. सेनेचे कार्यकर्ते ‘आपल्या तालुक्याचा कारभारी कोण?’ या विवंचनेत अडकलेत. भाजपचा एकांडा शिलेदार सोपान गवळी पळशी ग्रामपंचायतीच्या यशानंतर हुरळलाय. ‘अब की बार मोदी सरकार’ची घोषणा देत ‘महायुती’कडे जागा अदलाबादलीची मागणी करू लागलाय. पाहू या काय होतंय ते...
शिंदेंशी फाईट? ...एकेक करके मत आना !
By admin | Updated: June 11, 2014 00:57 IST