कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणली आहे. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अॅड. विजयराव कणसे यांचा ४७,२४७ मतांनी पराभव केला आहे. शिंंदे यांना ९५,२१३ तर अॅड. कणसे यांना ४७,९६६ मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार हणमंत चवरे यांना १५,८६२ आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे संजय भगत यांना १३,१२६ मतांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, अॅड. विजयराव कणसे वगळता सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्यानंतर आणि शिवसेना-भाजप-मित्रपक्ष युती संपुष्टात आल्यानंतर कोरेगावात चौरंगी लढत होण्याची शक्यता होती. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सर्वच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणामध्ये केवळ आठ उमेदवार राहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंंदे यांना कोरेगावातून पुन्हा एकदा संधी दिली होती, तर काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळवायचा, या हेतूने तालुकाध्यक्ष अॅड. विजयराव कणसे यांना उमेदवारी दिली. शिवसेनेने मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख हणमंत चवरे यांना तर स्वाभिमानी शेतकरी पक्षाने जिल्हा संपर्कप्रमुख संजय भगत यांना रणागंणात उतरविले होते. काँग्रेसच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वगळता अन्य कोणत्याही पक्षाचा एकही स्टार प्रचारक कोरेगावात आला नव्हता. त्यामुळे खरी लढत राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंंदे व काँग्रेसचे अॅड. कणसे यांच्यामध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. कोरेगाव मतदारसंघामध्ये २ लाख ९० हजार २५९ मतदार असून, त्यामध्ये १ लाख ४९ हजार ४५९ पुरुष, तर १ लाख ४० हजार ८०० महिला मतदार आहेत. त्यापैकी ९३ हजार ९०९ पुरुष मतदारांनी आणि ८३ हजार ९७३ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचे प्रमाण ६१.२८ टक्के एवढे होते. जळगाव येथे वखार महामंडळाच्या गोदामामध्ये निवडणूक निरीक्षक जे. आर. कंटवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांनी मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात केली. एकूण १४ टेबलांवर २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली. टपाली मतदान मोजण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या फेरीतच शिंंदे यांनी २,३२७ मतांची आघाडी घेतली, ती शेवटच्या २६ व्या फेरीपर्यंत कायम राहिली. टपाली मतदानामध्ये देखील त्यांनी बाजी मारली. शिंंदे यांनी मात्र एकही फेरीमध्ये अडीच हजारांपेक्षा कमी मते घेतली नाहीत. त्यांना एकूण ९५ हजार २१३ मते मिळाली. त्यांचे मताधिक्य अॅड. कणसे यांना कमी करता आले नाही. कणसे यांनी केवळ दहा फेऱ्यांमध्ये दोन हजार मतांचा आकडा ओलांडता आला. अॅड. कणसे यांना ४७ हजार ९६६ मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे हणमंत चवरे यांना तीन फेऱ्यांमध्येच चार अंकी मते घेता आली, इतर फेऱ्यांमध्ये तीन अंकी मते त्यांनी घेतली. त्यांनी १५ हजार ८६२ मते मिळविली. स्वाभिमानीचे संजय भगत यांना एकच फेरीत चार अंकी मते मिळाली, अन्य फेऱ्यांमध्ये ते तीन अंकी मते घेत होते. त्यांना १३ हजार १२६ मते मिळाली. मनसेचे युवराज पवार यांना १ हजार ७६६, अपक्ष शिवाजी शिरतोडे यांना १ हजार ४८९, रमेश दगडू माने यांना ३८९ व बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार विश्वनाथ बाबूराव मोरे यांना ८८४ मते मिळाली. दहाव्या फेरीअंती शशिकांत शिंंदे यांचे मताधिक्य वाढल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव, पुसेगावसह साताऱ्यातील खेड, कोडोली परिसरात जल्लोष करण्यास सुरुवात केली. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयाच्या घोषणा दिल्या. विसाव्या फेरीमध्ये विजय निश्चित झाल्याचे समजल्यानंतर आमदार शशिकांत शिंंदे हे पत्नी वैशाली शिंंदे, प्रदीप शिंंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, सदस्य सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, सतीश फडतरे, भास्कर कदम, पंचायत समिती सदस्य जयवंत पवार, प्रदीप कदम, दीपक कदम यांच्यासह मतमोजणी केंद्रामध्ये दाखल झाले. (प्रतिनिधी) चेहरामोहरा बदलणार : आ. शशिकांत शिंंदेकोरेगाव मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मी अविरत परिश्रम घेऊन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला आहे. प्रत्येक गावात आणि वाडी-वस्तीवर ठोस विकासकाम केले आहे. जनतेसाठी झटल्याने आज मला पुन्हा एकदा जनसेवेची संधी मिळाली आहे. जनतेने दिलेल्या मताचा आदर राखून सत्ता नसली तरीही भविष्यात प्रचंड विकासकामे करून दाखविणार आहे, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. मताधिक्यामध्ये वाढ२००९ मध्ये कोरेगाव हा नवखा मतदारसंघ असताना देखील शशिकांत शिंंदे यांनी ३२ हजारांचे मताधिक्य घेतले होते. या निवडणुकीत त्यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करायचे, असा चंग राष्ट्रवादीच्या विरोधातील सर्वच पक्षांनी बांधला होता. तरीही त्यांनी मताधिक्यामध्ये चांगलीच वाढ केली आहे. विकासाला शुन्य किंमतमतदारसंघामध्ये विकासकामांना शुन्य किंंमत असल्याचे दिसून आले आहे. विकासकामांपेक्षा लोक पैसा, मासांहर आणि मद्य यावर किंंमत करतात, हेच प्रकर्षाने दिसते. ज्यांनी दाद दिली नाही, तेवढेच मतदार लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम करु शकतात, असे अॅड. विजयराव कणसे यांनी सांगितले.
शशिकांत शिंदेच ‘जायंट किलर’
By admin | Updated: October 19, 2014 22:45 IST