सातारा : गेली अनेक वर्षे पाटणच्या जनतेची खेड्यापाड्यांत जाऊन सेवा करणारे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचा सध्या साताऱ्यात मुक्काम अधिक असतो. गणेशभक्त असलेले शंभुराजे रोज लाल दिव्याची गाडी पोलिसांच्या ताफ्यासह गणेशदर्शनाला येतात. कधी खिंडीतला गणपती, तर कधी पंचमुखी गणेशाच्या दर्शनासाठी मंत्र्यांची सवारी लवाजम्यासह निघते. ही वेळ लोकांची कार्यालयात जाण्याची असल्याने त्यांना मंत्रिमहोदयांचे दर्शन होईपर्यंत पोलीस अडवून ठेवतात. हीच परिस्थिती नाक्यावरून बाहेर पडताना असते.
शंभुराजे देसाई मंत्री झाले याचा सर्वच जिल्ह्याला अभिमान आहे. पण, त्यांनी आपल्या दिव्याचा उजेड लोकांची कामे करण्यासाठी पाडावा. लोकांच्या अडवणूक करण्यासाठी नको. सातारा शहरातून मंत्र्यांचा लवाजमा कारण नसताना फिरवला जातो. देवदर्शन हा काही शासकीय कामाचा भाग नाही. त्यामुळे त्यासाठी शासकीय वाहनांचा वापरही चुकीचा आहे. शंभुराजे देसाई यांच्याबद्दल सातारकरांना प्रेमच आहे. कधीही कोणीही त्यांच्यावर डूख धरून राहिलेले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्याच गावात आपल्याला असुरक्षित मानण्याचे कारण नाही. उलट नाक्यावर एकट्यानेच बसण्यापेक्षा आपली मंत्रिपदाची झूल आवरून लोकांमधूनही राहिले तर सर्वसामान्य सातारकरांच्या अडचणीही त्यांना समजून येतील.
दररोज ज्या रस्त्याने ते खंडीतील गणपतीकडे जातात तो समर्थमंदिराचा रस्ता अनेक दिवसांपासून खड्ड्यांचाच आहे. याकडे त्यांचे लक्ष जात नसावे. मोठ्या चाकांच्या गाडीमुळे त्यांना ते जाणवत नसले तरी कधीतरी खड्ड्यात पडण्याची सर्वसामान्यांना कायम भीती जाणवत असते. मोती चौकाच्या ज्या गल्लीतून ते जातात, त्या अरुंद रस्त्याबाबत, कधीतरी हा रस्ता रुंद करावा किंवा बाजारपेठेची व्यवस्था नीट करावी असे त्यांच्या मनात येत असेल तर त्यांनी ते प्रत्यक्षात आणणे आवश्यक असते.
शंभुराजे देसाईंना अनेक कष्टातून हे पद मिळाले त्याबाबतही शंका नाही; पण, त्याचा वापर कसा व्हावा याबाबत त्यांनी स्वत:च काही बंधने घालून घेणे आवश्यक आहे. मंत्र्यांचा रुबाब असला पाहिजे याबाबतही कोणाला शंका घेण्याचे काही कारण नाही; पण रोजचा रुबाब सातारकरांसाठी अडचणीचा ठरत असेल तर त्याला कुठेतरी थांबविणे आवश्यक आहे. पोवई नाक्यावर नो पार्किंगमध्ये थांबलेल्या गाड्या आणि सर्व गाड्या बाहेर पडेपर्यंत सातारकरांची होणारी अडवणूक आता रोजचीच झाली आहे.
गृहराज्यमंत्री राज्याचे की साताऱ्याचे?
गृहराज्यमंत्री म्हणून जिल्ह्यावर आणि राज्यात शंभुराजे देसाई यांचा दबाव असायला हवा. राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी आपली मते मांडायला हवीत. पण, साताऱ्याच्या आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या प्रश्नांवर ते फार आक्रमक होताना दिसत नाहीत. त्यांच्यातील शिवसैनिक अन्यायाविरोधात चवताळून उठलेला पाहायला मिळत नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपेक्षा इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच त्यांच्याकडे अधिक ऊठबस असल्याचे पाहायला मिळते.