खटाव : राज्यात दारुबंदिची चळवळ सर्वात प्रथम यशस्वीपणे करणाऱ्या डिस्कळ गावात सध्या वाढलेल्या अवैध दारु विक्री करणाऱ्या व्यवसायावर बंदी आणण्यासाठी रणरागिणी सह ग्रामस्थ सरसावले आहेत. अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी स्थानीक पातळीवरुन ग्रामसभेत केलेला ठराव तसेच ग्रामस्थांच्या तक्रारी लिखीत स्वरुपात असलेल्या प्रती संबंधीत पोलीस स्टेशन तसेच वरीष्ठ जिल्हा कार्यालयाशी वारंवार कळवुनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अखेर नुतन मुख्यमंत्र्याकडे गावातील ग्रामस्थ तसेच पदाधिकारी व महिलांनी धाव घेउन निवेदनाव्दारे साकडे घातले आहे. २0 वर्षापुर्वी याच डिस्कळ गावाने पहिल्यांदा दारुबंदीचा निर्णय घेऊन मोठी चळवळ उभी करुन एक आदर्श निर्माण केला होता. रणरागीणी महिलां एकवटुन त्यांनी या अवैध दारु व्यवसाय बंद पाडुन तीला हद्दपार केले होते. येथील परवानाधारक धारुचे दुकान त्यावेळी बंद करण्यात आले होते. याच गावाचा आदर्श घेत जिल्यात तसेच राज्यातही अनेक गावागावातील रणरागीणी महिला वर्ग आपापल्या गावात दारुबंदी करण्यासाठी सरसावल्या. ज्या डिस्कळ गावाने दारुबंदीची मुहुर्त मेढ रोवली त्या दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात आज दारु व्यवसायाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सध्या आठ ते दहा ठिकाणी दारु विक्रीसुरु आहे. स्थानीक पोलीस यंत्रणेमार्फत कोणतेच सहकार्य मिळत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी पोलीस महानिरीक्षक, तसेच पोलीस महासंचालक, यांनाही या निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत. (वार्ताहर)
दारूबंदीसाठी रणरागिणी सरसावल्या
By admin | Updated: December 5, 2014 23:36 IST