नितीन काळेल सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर मंदावला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ९४ तर महाबळेश्वरला ८२ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात सकाळच्या सुमारास सुमारे ९ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा २५.७० टीएमसी झाला होता.जून महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला होता. सुरूवातीला तीन दिवस दमदार पाऊस झाला. विशेष करुन पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयनागनर, नवजा येथे पावसाची संततधार होती. यामुळे भात खाचरात पाणी साचून राहिले. तसेच ओढे-नाले एक वाहून लागले.त्याचबरोबर पश्चिम भागातील पावसामुळे कोयना धरणात ही पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ही वाढू लागला होता. पण, मंगळवारपासून पावसाचा जोर मंदावला आहे. अधूनमधून पावसाची उघडीप पडत आहे. तर पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. कधीतरी पावसाची एखादी राप येऊन जात आहे. यामुळे पूर्व भागात तरी खरीप हंगामातील पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे.बुधवारी सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७९ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे ९४ आणि महाबळेश्वरला ८२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला ४६७, नवजा ४६० आणि महाबळेश्वर येथे ४०६ मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ८ हजार ९१२ क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणात २५.७० टीएमसी पाणीसाठा झालेला. २४.४२ टक्केवारी पाणी साठ्याची आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर मंदावला; नवजाला ९४ मिलिमीटरची नोंद
By नितीन काळेल | Updated: June 18, 2025 19:39 IST